संत कवि दासगणू विरचित श्री गजानन विजय ग्रंथाचा मराठी अनुवादित दहावा अध्याय प्रस्तुत करताना मी श्री गजानन महाराज व संत कवि दासगणू महाराजांचे वंदन करतो.
“श्री गजानन विजय ग्रंथ”
अध्याय दहावा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्री गजानन विजय ग्रंथाच्या दहाव्या ग्रंथाचा अध्याय प्रारंभ करताना सुरुवातीला श्री दासगणू महाराज श्री पंढरीनाथाची प्रार्थना करतात व म्हणतात, हे अरुपा, अव्यया, पूर्णब्रम्हा, पंढरीनाथा तू सज्जनांचा वाली व विसावा आहेस. आता मला तू परत लोटू नको. देवा या दासगणूला तुझ्यापासून वेगळ करू नकोस. मी पापी आहे म्हणून तू मला दूर करू नकोस.माझ्या विषयी कसलेही वाईट विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस.माझ्या हातून काहीच पुण्य झाले नाही हे मला माहीत आहे आणि विशेष म्हणजे तुला तोंड दाखवायची सुद्धा माझी लायकी नाही असं जरी असलं तरी ओहळास गोदावरी आपल्या पोटात घेत असते तसे तू माझ्यासाठी कर व माझ्या दुःखाच निवारण कर.माझ्या सर्व दुःखाचा अंत कर. तू मनांत आणलंस तर सगळं घडून येतं. तुझा वशिला मिळाला की रंकाचा राव होतो.
असो, एकदा पुण्यराशी श्री गजानन महाराज उमरावतीला आत्माराम भिकाजीच्या घरी गेले होते. हे आत्माराम भिकाजी संतप्रेमी, सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी गृहस्थ असून उमरावती प्रांताचे मोठे अधिकारी होते. त्यांच्या हातात मोठा अधिकार होता. श्री गजानन महाराज त्यांच्या घरी गेले असताना श्री आत्मारामानी त्यांची यथासांग पूजा केली. गरम पाण्यानं स्नान करत असताना विविध प्रकारची उटणी लावली. तेथे गजानन महाराज प्रत्यक्ष गेलेले असल्यामुळं त्यांच्या संत सहवासानं खूप आंतरिक आनंद झाला होता. स्नान झाल्यावर समर्थांना कर्वतीकाठी उमरेडची धोतरजोडी नेसवून दिली. कपाळावर केशरी गंधाचा भव्य टिळा लावला. गळ्यात फुलांचे हार घातले. नाना प्रकारचे नैवेद्य दाखवले. शंभर रुपये दक्षिणा ठेवली. धूप, दीप आरती व मंत्रपुष्पांजली झाली. उमरावतीच्या लोकांची दर्शनासाठी खूप गर्दी झाली होती.
तेथे हजर असलेल्या प्रत्येक भाविकाला, समर्थाना आपल्या घरी नेऊन त्यांचं यथासांग पूजन करावं असं वाटत होतं. सगळ्यांना असं वाटत असलं तरी त्यामध्ये थोड्यांचीच इच्छा पूर्ण झाली. समर्थांची पाऊलं कोणाच्याही घराला लागायला बलवत्तर पुण्य पाहिजे हेच खरं! ते ज्यांच्याकडं होतं ते गजानन महाराज आपल्या+सामर्थ्याने ओळखून मगच महाराज त्यांच्याकडे जात असत.
श्री गणेश श्रीकृष्ण खापर्डे हे उमरावतीचे फार मोठे श्रीमंत गृहस्थ होते. वकीलीत त्यांच्यापुढं रुपयांचे ढीग लागत होते. त्यांना वऱ्हाडात सर्वजण दादासाहेब म्हणत. हे भाविक सज्जन शुक्लयजुर्वेदी ब्राह्मण होते. त्यांनी विनंती केल्यावर महाराज त्यांच्या घरी गेले. तिथेही गजानन महाराजांची यथासांग विधिवत पूजा झाली. तेथेच एक गणेश आप्पा म्हणून एक लिंगायत वाणी होता. त्याच्या पत्नीचं नाव चंद्राबाई असं होतं. ती परम भाविक होती. ती पतीला म्हणाली, “कसही करून या साधूंना आपल्या घरी आणा बरं! तुम्ही विनंती करून पहा. आपलं मन जर निष्पाप असेल तर यांच्या आगमनामुळं आपलं घर पवित्र होईल. भाविकांची देवाला कदर असते.” त्यावर तिचा नवरा गणेश आप्पा म्हणाला, “तुला काय वेड लागलंय की काय? ह्या साधूंना घरी न्यायला फार मोठा बलवत्तर वशिला पाहिजे. श्री खापर्डे सारख्या श्रीमंत माणसाला यांना घरी न्यायला किती कष्ट पडले असतील ते लक्षात घे व उगीच हट्ट करीत बसू नको.”
त्यावर चंद्राबाई म्हणाली, “नाथा, हे मला काही मला पटत नाही. माझ मन मला सांगत आहे कि, आपल्या घरी साधू श्री गजानन महाराज येतील. तुम्ही त्यांना नुसती घरी येण्याची विनंती करा. गरीबावर संतांची विशेष प्रीती असते.” एवढं झालं तरी अप्पांची काही बोलायची छाती होईना. शेवटी महाराजच गणेश अप्पाचा हात धरून म्हणाले, “अरे तुझं घर येथून किती लांब आहे? मला तुझ्या घरी येऊन काही वेळ बसावं असं वाटतं. मनात असेल ते बोल ना रे? तुला कसली रे भीती ?कोणतीही शंका कुशंका मनात न आणता माणसानं स्पष्ट बोलावं रे !”
महाराजांनी असं म्हंटल्यावर गणेश आप्पाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने श्री गजानन महाराजाना घरी नेले व उभयता पती पत्नीने महाराजांची पूजा केली व त्यांचा संसार त्यांनी “श्री”+च्या चरणी लगेच अर्पण केला. अशा अनेक पूजा उमरावतीत झाल्या. प्रत्येक पूजेच्या वेळी आत्माराम भिकाजीचा भाचा बाळाभाऊ हजर असे. हा मुंबईचा राहणारा असून तारमास्तर होता. तो रजा घेऊन उमरावतीस त्याच्या मामाला भेटायला आला होता. या बाळाभाउंना सुद्धा समर्थ गजानन महाराजांचा ध्यास लागला.
ते म्हणाले कि, “अशा साधूचे चरण सोडून कोठेही जाऊं नये. हा प्रपंच पूर्णपणे अशाश्वत आहे मग मी कशाला त्यात आपले मन गुंतवू? आजपर्यंत जेवढा संसार केला तेवढा तो आता पुरे झाला. आजपासून मी यांचे चरण सोडणार नाही. अमृताला टाकून विष प्यायला कोण जाईल?” या विचाराने प्रत्येक पूजेला बाळाभाऊ हजर रहात होते.
कांहीं दिवसांनी महाराज उमरावतीहून शेगावी परत आले. पण मळ्यात न जाता मोट्याच्या मंदिराच्या परिसरात आले. त्या मंदिराच्या पूर्वेस एक ओसाड जागा होती. तेथे श्री महाराज येऊन राहिले. आपल्या मळ्यातली जागा सोडून श्री गजानन महाराज ओसाड जागेत जाऊन राहिले आहेत ही बातमी कृष्णा पाटलाना कळली. ते धांवत येऊन महाराजाना दंडवत करून मान खाली घालून बसले. आत्यंतिक दुःखामुळे त्यांचं वस्त्र भिजून जाईल इतकं पाणी त्यांच्या डोळ्यांतून वहात होतं.
त्यांना महाराज म्हणाले, “एवढा का रडतो रे बाबा? तुला कोणते दुःख झालं ते मला सांग बरं!” त्यावर दोन्ही हात जोडून पाटलांनी विचारले, “महाराज आपण माझ्या मळ्याचा अव्हेर का बरं केलां? असा कोणता अक्षम्य अपराध माझ्याकडून झाला? ज्ञानवंता दयाळा, मी आपले लेकरु आहे. ही एका माळ्याच्या मालकीची देशमुखाच्या बाजूची जागा आहे. येथे तुम्ही राहू नका. मळ्यात रहायची मर्जी नसेल तर तुम्ही माझ्या राहात्या घरी चला. दयाळा तुम्हासाठी ते लगेच खाली करतो कारण तुम्हावाचून मला काहीच प्रिय नाही.”
अवघ्या पाटील मंडळीना ही गोष्ट कळली. ते सर्वही धांवून आले आणि महाराजाना विनंती करू लागले कि, “तुम्ही आमच्या घरी या.” महाराज म्हणाले, “तुमच्या हितासाठीच मी या जागेवर येऊन बसलो आहे व ते का ? हे सर्व तुम्हाला नंतर कळेल. पण आता यावर काही वाद विवाद आता नको! वाद विवाद ही गोष्ट दोघांचेही एकमेकांपासून संबंध वेगळं करेल हे विसरु नका. जगात जेवढे म्हणून जमीनदार आहेत ते सगळे कसलाही विचार करत नाहीत हीच त्यांच्यातली उणीव आहे. जा बंकटलालाला घेऊन या. मी त्याचं घर सोडल्यावर तो रागावला नव्हता का ? ते त्याला विचारा. माझी तुमच्यावर कृपा आहे ती कोणत्याही कारणांनी तुम्हाला कधीही कमी पडू देणार नाही. बंकटलाल तेथे गेले व तेथे जमलेल्या मंडळीची समजूत घालून म्हणू लागले कि, “यांच्या मर्जीविरुद्ध तुम्ही महाराजाना मळ्यांत नेऊ नका. श्री गजानन महाराज जेव्हा येथून गेले तेव्हा त्याच्या मर्जीपुढे मी काहीच करू शकलो नाही. आपण त्यांची लहान लेकरे आहोत. त्यांची दृष्टी सर्वांकरीता एकसमान आहे. सखाराम आसोलकार मनाने मोठा आहे. तो जागा द्यायला विरोध करणार नाही असे वाटते. सखाराम जागा देईल तेव्हा आपण पुढील निर्णय घेऊ म्हणजे सगळ्यांनाच यात सहज आपापल्या भावना व्यक्त करता येतील.”
बंकटलालनी सांगितलेल्या ह्या प्रस्तावावर सर्वांचं एकमत झालं. सर्वांनी मिळून त्या ठिकाणी मठ बांधला व ह्या कार्याकरीता त्यासाठी परसराम सावजींनी विशेष कष्ट घेतलेत. श्री गजानन महाराजांबरोबर नेहमी त्यांचे चार निस्सीम भक्त राहात होते ते भास्कर, बाळाभाऊ, पितांबर आणि उमरावतीचे गणेश आप्पा! त्याचबरोबर रामचंद्र गुरवही बरोबर राहात होते. अशा या पांच पांडवामध्ये श्री हरी म्हणून गजानन महाराज शोभून दिसू लागले. तशातच बाळाभाऊंची वृत्ती अति विरक्त झाली होती. त्यानी त्यांच्या नोकरीची अजिबातच पर्वा केली नाही. आपण घरी या म्हणून घरच्या लोकांची त्यांना वरचेवर पत्रे येत होती. पण त्यांच्यावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. भास्कर समर्थाना म्हणाला, “गुरुराया, हा पेढे खायला आतुर झाला होता म्हणून आपल्याला सोडून दुसरीकडे जायला धजत होता. याला तिकडे घरी जायची इच्छा होत नाही म्हणून तुम्ही याला चांगला मार द्या म्हणजे हा आपल्या घरी जाईल. चौदावं रत्न पाहिल्याशिवाय हा येथून हलणार नाही. काठीशिवाय माकड कधी सरळ होत नाही. मोठमोठाले पहाड वज्राला मात्र अवश्य भितात.” एकदा बाळा भाऊना मोठं मोठे आमिष दिले पण त्याचा काही फायदा झाला नाही उलट ते नोकरीचा राजीनामा देऊन पुन्हा परत आले. बाळाभाऊंना पुन्हा शेगावात आलेलं पाहून भास्कर त्यांना म्हणाले, “येथे वरच्यावर येऊन आम्हाला का त्रास देतोस रे? ओढाळ बैलाला बडवून हाकलून दिलं तरी पुन्हा तो कायम हिरव्या गवतावर पडायला येत असतो तू तसाच लोचत दिसतोस. लोचटा तुझी कृति बिलकुल अगदी तशीच आहे. ज्याला संसाराची विरक्ति झाली आहे त्यांनीच येथे यावं.” भास्करांचं असं गर्व युक्त भाषण महाराज स्वतः ऐकत होते जे त्यांना ते अजिबात आवडलं नाही. भास्करांचे अज्ञानमती ज्ञान नष्ट करण्यासाठी श्री गजानन महाराजांनी एक घटना केली. एका गृहस्थाच्या हातातली एक बरीच मोठी छत्री घेऊन महाराजांनी बाळाभाऊंना खूप झोडपून टाकले. एवढं मारलं , एवढं मारलं की , मारतां मारता ती छत्रीच मोडून गेली मग एक मोठी वेळूची भरीव काठी हातात घेऊन त्या काठीने बाळाभाऊंना पुन्हा महाराजांनी मारायला सुरुवात केली. ते पाहून लोक खूप भ्याले. काही तर मठ सोडून पळून गेले. पण बाळाभाऊ समर्थांच्या पुढे तसेच पडून राहिले. कित्येकांना वाटलं की, बहुधा हे समर्थांच्या माराने मरण पावले. बाळाभाऊना दिलेला मार पाहून भास्करही चिंतातुर झाला होता. पण समर्थांच्या समोर बोलण्याची त्यांची छाती होईना. बाळाभाऊंना समर्थानी मारायला सुरवात केल्यावर, छत्री तर आधीच मोडली होती नंतर हातात घेतलेली काठीही मोडली. ते पाहून समर्थ बाळाभाऊंना पायानं तुडवू लागले. जसा एखादा कुंभार पायानं माती तुडवतो अगदी त्याचप्रमाणे बाळाभाऊंना महाराज पायानं तुडवत होते. मठातला हा प्रकार पाहून महाराजांचा शिष्य समुदाय पळत गेला. त्यातले काही त्यांच्या आवडीच्या मंडळीना बोलवायला गेले. बंकटलाल, कृष्णाजी मठाकडे धांवत आले पण समर्थांचा हात धरायला कुणीच तयार होईना! बंकटलाल भीत भीत म्हणाले, “समर्था हा आपला भक्त आहे. आता तरी याला पायाने तुडवू नका. बंकटलालांचे बोलणं ऐकून समर्थ हास्य स्मित करीत म्हणाले, “हे असं काय असंबद्ध बोलता? ना मी बाळाला मारलंय, ना त्याला तुडवलंय! त्याला निरखून पहा म्हणजे तुम्हाला कळेल.”
महाराज बाळभाऊंना म्हणाले, “वत्सा उठ आता व या सर्व मंडळींना तुझे अंग दाखव. जशी समर्थांची आज्ञा झाली तसेच तेथील मंडळी बाळाभाऊंना निरखून पाहू लागले. ते पहातात तो वळाचे कोठेही नांव नाही. कुठं काही लागलेलंही दिसेना. उलट अगोदर सारखेच ते आपल्या आनंदात निमग्न होते. हे सगळं झाल्यावर भास्करांना बाळाभाऊंचा अधिकार कळला. नंतर तेही कधी बाळाभाऊंना वेडंवाकडं बोलले नाहीत. अशुद्ध सोनं जेव्हा तापून बाहेर येते तेव्हाच त्याची किंमत कळते. तो सगळा प्रकार पाहून सर्वानाच आश्चर्य वाटले. सुकलाल अगरवाल म्हणून एकजण बाळापुरात होते. त्यांच्या गोठ्यात एक द्वाड गाय होती. ती गांवांत फिरायची, मुलांमाणसांना तुडवायची, सशक्त लोकांना शिंगानं हुंदडायची, अचानक वाटेल त्या दुकानांत जायची, धान्याच्या टोपल्यांत तोंड खुपसायची, वाटेल तितके यथेच्छ खायची, तेलातुपाची पिपे अंगानं धक्का देऊन सांडून टाकायची. घरी बांधून ठेवलेलं असलं तरी हां हां म्हणता बांधलेली चऱ्हाटं तोडून टाकायची. साखळीला सुद्धा ती जुमानत नसे. ती गाय नसून एक प्रकारे वाघीणच होती. बाळापुरातले लोक तिचा त्रास सहन करून करून अगदी कंटाळून गेले होते व ती गाभणही होत नव्हती. घरात कोंडताही येत नव्हते. शेवटी लोक सुकलालना म्हणाले, “या गाईला खाटकाला द्या किंवा बंदुकीने गोळी घालून मारून टाका.” त्यावर सुकलाल लोकांना म्हणाले, “वाटेल ते प्रयत्न करून तुम्हीच तिला मारुन टाका. एका पठाणानें तिला बंदुकीने मारण्याचा प्रयत्न केला पण तिला त्याबातीत कसे काय कळले कोण जाणे ! मग तिने आपल्या शिंगाने मारून पठाणाला उताणे पाडले. मी गायीला परगांवाला नेऊन सोडून दिली होती. पण ती पुन्हा परत आली. आता मी काय करु ते तुम्हीच सांगा. “त्यावर लोक म्हणाले, “आता त्यावर एकच उपाय आहे. शेगावच्या गजानन महाराजांनी गोविंद बुवांचा घोडा गरीब केला होता तसा आता तुम्ही ही या गाईला घेऊन शेगांवाला जा व तिला गजानन महाराजाना अर्पण करा म्हणजे झालं. साधूस गाय दिल्याचे पुण्य तुम्हाला लाभेल आणि आमचेही संकट टळेल.” तें अवघ्यांना पसंत पडले व ते गाईला शेगावला नेण्याबाबत विचार करू लागले. त्यासाठी तिला कस पकडायचं हा मोठा प्रश्न होता. तिला धरायचं म्हणून अनेक प्रयत्न केले पण कोणालाच त्यात यश आलं नाही. शेवटी एका पटांगणात हरळकुंढयाचा ढीग केला व तेथेच बाजूला गाईला खाण्यासाठी सरकी आणून ठेवली तेव्हा कुठं ती गाय ती सरकी खाण्यासाठी आली. जशी गाय आली त्याचबरोबर दहावीस जणांनी फास टाकून तिला पकडले व साखळदंडानें बांधून गाडीवर उचलून ठेवून श्री गजानन महाराजांना ती गाय अर्पण करण्यासाठी शेगांवला घेऊन आले. पण आश्चर्य असं झालं कि, जस जसं शेगाव जवळ येऊ लागलं तसतसं गाईच्या स्वभावात बदल येऊ लागला. महाराजापुढे पुढे येताच ती एकदम गरीब झाली. त्या गायीच्या लोचनात /डोळ्यात पाणी आलं व ती त्या पुण्यपुरुष महाराजांकडे निरखून पाहू लागली.
ते दृष्य पाहून महाराज म्हणाले, “तुम्ही हा काय मूर्खपणा केला? गाईला अशा यातना देणं बरोबर आहे का? तुम्ही तिचे चार ही पाय बांधलेत, गळ्यात साखळदंड टाकलेत, काथ्याची चऱ्हाटे लावलीत व तिच्या शिंगांचीही अशीच गत केली. अहो एवढा बंदोबस्त वाघिणीला करीत असतात. गाईला असं करणं बरोबर नाही. अरे खुळ्यांनो, ही गाय म्हणजे अवघ्या जगाची माय आहे. तिची तुम्ही अशी अवस्था केली? केवढा हा दुर्धर प्रसंग आणला? तिला आत्ताच माझ्यासमोर मुक्त करा. ती आता कोणालाही काही करणार नाही. पण तिला हात लावायची कोणाचीच छाती होईना. जो तो तिला पाहून मागे सरकत होता. मग महाराज तेथे त्वरेने येऊन त्यांनी आपल्या पवित्र हातानी गाईची बंधने तोडली. बंधने तुटल्यावर गाय गाडीच्या खाली आली. तिने श्री गजानन महाराजाना वंदन करण्यासाठी आपले पुढचे पाय महाराजांसमोर टेकले. नंतर खाली मान घालून तीन प्रदक्षिणा केल्या व मग ती “श्री” चे दिव्य चरण जिभेनं चाटूं लागली. हा झालेला प्रकार सर्वांनी आपल्या उघडया डोळ्यांनी पाहीला. समर्थांच्या प्रभावाला शेषही वर्णूं शकणार नाही. समर्थ धेनूला म्हणाले, “बाई, आता कोणाला त्रास देऊ नकोस. आता तूं हा मठ सोडून पण कोठेही जाऊ नको.” ही महाराजांची लीला पाहून सर्वांनी समर्थांचा उच्च स्वरानें त्रिवार जयजयकार केला. बाळापूरची मंडळी बाळापुरला निघून गेली. गाय मात्र मठातच राहिली. त्या दिवसापासून त्या गाईला चर्हाट कधीही लागलं नाही. एखाद्या शहाण्या गाईच्या अंगात असणारे सर्व गुण गायीच्या ठिकाणी आले. अजूनही शेगांवात तिची संतती नांदते. ब्रह्मवेत्ते जे जे काही म्हणतात तेच घडून येत असते.
असो कारंज्याला, घुडे नांवाचा एक श्रीमंत माणूस होता. त्याला पोटाचा आजार झाला होता त्यावर अनेक उपाय केले पण काही आराम पडला नाही. पाण्यासारखा पैसा खर्च करून सुद्धा काही उपयोग झाला नाही. त्याने समर्थांची कीर्ति कर्णोपकर्णी ऐकली होती. म्हणून तो सहपरिवार शेगावला आला. त्याची अवस्था एवढी बिकट होती की, रोगाच्या व्यथेने त्याला चालायला येत नसल्याने दोघां तिघांनी उचलून त्याला महाराजांसमोर शेगावला आणले. समर्थाना साधा नमस्कार करायला सुद्धा तो असमर्थ होता.
त्याच्या पत्नीने महाराजांसमोर पदर पसरला आणि म्हणाली कि, “दयाघना! मी आपली धर्मकन्या आहे माझ्या पतीच्या दुर्धर यातना आपण हरण कराव्यात अशी प्रार्थना करते. आपल्या रूपाने अमृताचे दर्शन होत असताना माझ्या पतीला मरण का बरे यावे? माझ्या कुंकवाचे रक्षण करा हीच विनंती.” त्या वेळी समर्थ स्वारी आंबा खात होती. तोच आंबा त्यांनी बाईंच्या अंगावर फेकला व म्हणाले कि, ” तू आता येथून जा, व हा आंबा तुझ्या पतीला खायला दे, म्हणजे त्याचं पोट दुखणं बंद होऊन जाईल. तू त्याची पत्नी म्हणून त्याला अगदी शोभून दिसतेस. अगदी पति-भक्ति-परायण आहेस.” एवढे बोलून महाराज चिलीम ओढूं लागले.
भास्कर म्हणाले, “अहो बाई, आतां येथे काही बसू नका.जा लवकर आपल्या घरी कारंज्याला व आपल्या पतीला लगेच हा आंबा खायला द्या. महाराजांच्या हातून जो आंब्याचा प्रसाद तुम्हाला मिळालाय तोच तुम्ही तुमच्या पतीला खायला द्या म्हणजे तुमचे काम होईल व त्यांना अत्युत्तम गुण येईल. आंबा खाताच लक्ष्मणाला आराम वाटेल.” बाई आंबा घेऊन कारंज्याला परत आली व तिने तो आंब्याचा प्रसाद तिच्या पतीला खाण्यास दिला.घरी आल्यावर जो तो त्यांना विचारू लागला कि शेगावात काय काय झालं ? असं विचारू लागलयावर बाईनी शेगावचा सर्व वृत्तांत तेथील लोकांना सांगितला व म्हणाली कि, “समर्थांनी प्रसाद म्हणून आंबा दिला व आदेश केला कि हा आंबा तुझ्या पतीला तुझ्या हातानं खायला दे. त्याप्रमाणे मी केले. आज सकाळी त्यांना आंबा खाऊ घातला.” हे वैद्यांनी जेव्हा ऐकले, तेव्हा त्याना फार वाईट वाटले. ते बाईंना म्हणाले , “अहो बाई, तुम्ही हे काय केले? आंबा हेच या पोटांतील रोगाला कुपथ्य आहे. वैद्यकीय निदानात हेच सांगितल आहे व सुश्रुतांनीही हेच वर्णन केलंय. शारंगधरही असेच म्हणतात. तो प्रसाद तुम्ही खायला हवा होता. पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडते.” वैद्यांचं बोलणं ऐकून सर्व नातेवाईक घाबरले व ते लक्ष्मणाच्या पत्नीस टोचून बोलू लागले.
जरी वैद्यांनी कुपथ्य झालं असं म्हंटलं असलं तरी काही वेळानं लगेच अस अघटित घडलंं कि, लक्ष्मणाचे पोटाला अचानक रेच होऊन ते मऊ झालं. शौच्यावाटे व्याधि निघून गेली. हळुंहळूं पहिल्यासारखी शक्ति आली. वैद्यकशास्त्र जे नैसर्गिक असेल त्याप्रमाणे काम करत हे जरी खरं असलं तरी “श्री” च्या शक्तीपूढे हा वैद्यकीय पिटारा काही कामाचा नव्हता. इतर काहीही करणं जरी शक्य होत नाही तरीपण अशा ठिकाणी देवाची व संतांची कृपा उपयोगी पडते. लक्ष्मण बरा झाल्यावर लगेच शेगांवला आला आणि महाराजांना म्हणू लागला कि, “महाराज आपण माझ्या घरी या व आपले पवित्र चरण माझ्या घरी लावून पवित्र करा. मी खास त्यासाठी आलो. महाराज आपण कारंज्यास चला. मला नाराज करू नका. त्याच्या विशेष आग्रहा वरून महाराज कारंज्याला गेले. बरोबर शंकर-भाऊ आणि पितांबर होते. लक्ष्मणाने घरी नेऊन पूजा केली व म्हणाला कि, “ही अवघी संपत्ती आपलीच आहे. तिचा दक्षिणा म्हणून स्वीकार करावा.” तोंडानं असं म्हणाला पण एका ताटांत काही रुपये ठेऊन ते ताट त्याने पुढे केले. ते बघून महाराज म्हणाले, “सगळं मला अर्पण करू माझं काही उरलं नाही असं आत्ता तूच म्हणालास ना? मग हे रुपये कोठून आले? असे दांभिकपणाचे चाळे करु नको. मला तू आपलं घर दिलं? मग उघड सगळी दारं आता आणि सगळी कुलुपं रस्त्यावर फेकून दे.
यावर लक्ष्मण काहीच बोलला नाही. मौन धरुन बसला. पण समर्थानी त्यांचा आग्रह सोडला नाही. म्हणाले, “खजिन्याचे दार उघड.” लक्ष्मणाने भीत भीत दार उघडले आणि खजिन्याच्या उंबर्यावर स्वतः जाऊन बसला व म्हणाला, “महाराज, या व वाटेल ते घेऊन जा.” असं म्हणाला खरं, पण त्याच्या अंतरीचा भाव वेगळाच होता. हे त्याचे दांभिक पण समर्थांच्या लक्षात आले होतेच. कारण बहुरुप्याने कितीही सोंग आणले तरी त्याचे सोंग बाजारात किती काळ टिकणार? जसा कडू वृंदावन वरुन पाहता छान दिसतो पण त्याच्या आत मध्ये पूर्ण कडवटपणाच भरलेला असतो.
लक्ष्मणाचे सगळे रंगरूप बघून महाराजानी त्याचं घर सोडून दिलं. दांभिकाच्या घरात संत कधीच तृप्त होत नाहीत. खरं तर त्याच्या घराची वा धन दौलतीची गरज समर्थाना बिलकुल नव्हती. ते तर वैराग्याचे सागर पण तो जे बोलला त्याचा सत्य पणा समर्थानी बघितला व त्यांना त्याच्या दांभिकपणाचा राग आला. म्हणून ते उठून गेले. जाता जाता बोलले, “माझं माझं म्हणतोस काय, आता भोग त्याची फळं! माझ्याकडं त्याला उपाय नाही. मी तुझ्यावर कृपा करायला आलो होत व तुला त्यापेक्षा दुप्पट द्यावं असा विचार करून तुझ्या घरी आलो होतो. पण ते तुझ्या नशिबात नाही रे.” तेच पुढे खरे झाले. सहा महिन्यांत अवघी लक्ष्मी फस्त होऊन लक्ष्मणावर भीक मागायची वेळ आली. परमार्थांत किंचितही खोटेपणा खपत नाही हे लोकांच्या लक्षात यावं यासाठीच समर्थानी हे चरित्र लिहून घेतलं. श्री गजानन महाराज हे चिंतामणी आहेत त्याना गार काय शोभा आणणार किंवा सोन्याला काय किंमत देणार? हा श्री संत दासगणू विरचित श्री “गजानन विजय” ग्रंथाचा हा दहावा अध्याय सर्व श्री गजानन महाराजांच्या भक्तांना सुखदायी होवो व सर्वाचे कल्याण करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करोत ही शुभेच्छा देऊन हा दहावा अध्याय समाप्त करीत आहे.
शुभं भवतु…
श्री हरिहारार्पणमस्तू !
इति श्री गजानन विजय ग्रंथ दहावा अध्याय सुफळ संपूर्ण !
शुभं भवतु !
|| श्रीहरिहरार्पणमस्तु ||