You are currently viewing ●!! जय श्री गुरुदेव दत्त !!●

●!! जय श्री गुरुदेव दत्त !!●

– अभय आचार्य

– संकलन,

सुरेंद्र रविंद्र पाटील.

                गाणगापूरला मठात कायम समाराधना होत असत. नैको S पि दिवसो यातो विना ब्राह्मणभोजनम् ll समाराधना नाही असा एकही दिवस नसे. एके दिवशी काश्यप गोत्री भास्कर नावाचा ब्राह्मण तिथे आला. सोबत तीन माणसांना पुरेल इतका शिधा होता. स्वल्प होते तंडुल कणिक ll थोडे तांदूळ, कणिक असा शिधा घेऊन तो गाणगापूरच्या मठात आला. कशात आणणार ? एक छोटेसे गाठोडे बांधून घेऊन आला. मनात आपणही समाराधना करावी हा विचार होता. गुरुमहाराजांचे दर्शन घेतले, साष्टांग नमस्कार करून महाराजांना प्रार्थना केली.

                आला त्या दिवशी अन्य एका ब्राह्मणाची समाराधना होती .त्याला भोजनाकरिता बोलावून घेऊन गेले, रात्र झाली. हा ते गाठोडे उशाला घेऊन निजला. दुसऱ्या दिवशी अन्य एकाची समाराधना होती. तिसऱ्या दिवशी अन्य कोणाची. असे करता करता तीन महिने झाले. मठातील भक्त मंडळी याचा उपहास करू लागली. चक्रुस्तस्योपहासं तं शुश्राव श्रीगुरूः स्वयम् ll गुरूमहाराजांनी हा उपहास ऐकला. भास्कर ब्राह्मणाला महाराज बोलावून म्हणाले, आज तुझी समाराधना असावी. महाराजांचे हे वाक्य कानी पडताच भास्कराला अत्यानंद झाला. महाराजांच्या पायावर डोके ठेऊन धावतच स्वयंपाकाची अन्य सामग्री आणण्यास गेला. हर्षे गेला आइतीसी ll दोन शेर तूप आणले. शाका म्हणजे भाज्या आणल्या. स्नान करून स्वयंपाकास लागला.

                समस्त ब्रह्मवृंद महाराजांना म्हणाला, आज समाराधना राहिली, नित्य मिष्टान्न होत असे, आज मात्र घरी जेवावे लागणार असे दिसते. गुरुमहाराज म्हणाले, का घरी जाताय? स्नान करून या, इथेच भोजन होऊ द्या. हे ऐकून समस्त ब्राह्मण मनात विचार करते झाले, मठात सामग्री आहे कदाचित. गुरुमहाराज त्याचा स्वयंपाक करवतील. सर्व स्नानाला गेले.

               महाराज भास्कर ब्राह्मणाला म्हणाले, स्वयंपाक झाला असेल तर सर्वाना बोलावून ये. भास्कर सर्वाना बोलावण्यासाठी गेला असता ते म्हणाले अरे रात्र होईल, गुरुमहाराजांची भिक्षा होऊ दे. मात्र गुरुमहाराजांचा सहभोजनाचा निश्चय ऐकून तो पुनश्च बोलावण्याकरिता गेला. मात्र ते येईनात तेव्हा गुरुमहाराजांनी मठातील अन्य काही शिष्याना त्यांना बोलावण्यास पाठविले.
                सर्व ब्राह्मण स्नान करून आले तेव्हा गुरुमहाराज सर्वाना म्हणाले पत्रावळी करा आणि भास्कराला म्हणाले या समस्त ब्राह्मणांना तू आज सहकुटुंब जेवावे म्हणून निमंत्रित कर. या निमंत्रणावर ब्राहमण म्हणाले, रे भास्करा आम्हा इतक्यांना जेवायला बोलावतोस, एकेक शीत तरी वाट्याला येईल का?? यावर काही वृद्ध ब्राह्मण मंडळींनी दटावून सर्वाना म्हटले, गुरुमहाराज जसे आज्ञापित आहेत तसे तो सांगत आहे तेव्हा उपहास करू नये. पत्रावळी झाल्या तोवर भास्कर ब्राह्मणाने महाराजांची पूजा केली .
                महाराज म्हणाले, स्वयंपाक आमच्यापाशी आणून ठेवा . स्वतःची छाटी महाराजांनी त्यावर घातली आणि आपल्या कमंडलूतील जलाचे प्रोक्षण केले. महाराज म्हणाले अन्न न उघडता, काढून घ्या आणि पंगतीत वाढा. हे ऐकताच अनेक ब्राह्मण वाढायला उठले. सह्पंक्तीसी श्रीगुरुसी l जेवितांती अतिहर्षी ll भास्कराने आपल्या हाती तूप घेतले आणि आग्रहाने वाढत होता. विप्र म्हणती पुरे करी l आकंठ मर्यादा जेवलो ll सर्व संतुष्ट झाले. नंतर त्यांचे कुटुंबीय, गावातील अन्य प्रजा, प्राणिमात्र सर्व जेवले. तेव्हा गुरुमहाराजानी भास्कर ब्राह्मणाला जेवून घ्यावयास सांगितले. शेवटी पाहिले असता जेव्हडा स्वयंपाक केला होता तेव्हडाच शिल्लक होता. ते सर्व अन्न जलचरांना घातले.
                भास्कर ब्राह्मणाला गुरुमहाराजांनी आशीर्वाद दिला, वर देती दारिद्र दुरी l पुत्र पौत्र होतील तुज ll 

                दत्त महाराजांच्या लीला अगम्य आहेत,महाराजांच्या ह्या प्रसंगाच्या वेळी आम्ही कोणत्या जन्मात, योनीत असू ठाऊक नाही मात्र आज ह्या कथा वाचायचे ऐकायचे भाग्य आम्हाला लाभते आहे हे हि नसे थोडके, भाग्यवान आहोत…

!! जय श्री गुरुदेव दत्त !!

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply