You are currently viewing नाथांच्या घरचा “विजयी पांडुरंग”…

नाथांच्या घरचा “विजयी पांडुरंग”…

          पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे , त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुल, वस्त्र, अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते।

          वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे…

          आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो…. म्हणून त्याला” विजयी पांडुरंग” असे म्हणतात.

          हा विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे , हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपाने मिळालेला आहे, ही मूर्ती दिडफुट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं त्याने मंदिर बांधलं आणि सोनारकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला  “माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध तू तसं केलंस तर तुझा निर्वंश होईल “मग राजाने विचारले की या मूर्ती चे काय करू तेव्हा पांडुरंग म्हणाला की पैठणच्या नाथ महाराजांना नेऊन दे…

          त्यानंतर राजाने ती मूर्ती वाजत गाजत पैठण ला आणली तेव्हा नाथ महाराज मंदिरात असलेल्या खांबाला टेकून प्रवचन सांगत होते ते ज्या खांबाला टेकून पुराण सांगायचे त्या खांबाला पुराण खांब असे म्हणतात. राजा रामदेवराय नाथांचे प्रवचन संपेपर्यंत थांबले आणि त्यांनी ही मूर्ती तुमच्याकडे कशी व का आणली हे सर्व नाथांना सांगितले आणि त्यामुळे भगवंतांना तुमच्याकडे ठेवून घ्या असे  सांगितले…

          त्यावर नाथांनी मूर्तीला नमस्कार केला आणि म्हणाले की, तू राजाच्या घरी राहणारा आहेस माझ्याकडे तुझी रहायची इच्छा आहे पण राजा सारखे पंचपक्वान्न माझ्याकडे तुला मिळणार नाही, तेव्हा या भगवंताच्या पायाखालच्या विटेवर अक्षरं उमटली “दास जेवू घाला न.. घाला” म्हणजे हे नाथ महाराज मी तुझ्याकडे दास म्हणून आलोय तू जेवायला दे अथवा न दे मी तुझ्याजवळ राहणार आहे . हे ह्या मूर्तीच एक वैशिष्ट्य सांगता येते की विटेवर असूनही ही उमटलेली अक्षरे आहेत.

          प्रत्यक्ष भगवंत घरी आले म्हणल्यावर पूर्वी पाहुणचार म्हणून कोणी बाहेरून आले की गुळ पाणी दिले जायचे पण प्रत्यक्ष भगवंत आलेत म्हणल्यावर त्यांनी आपल्या पत्नीला आवाज दिला त्यांचे नाव गिरीजाबाई होते त्यांचा पाहुणचार म्हणून बाईंनी चांदीच्या वाटीत लोणी आणि खडीसाखर आणलं नी नाथांच्या समोर धरलं हे लोणी घेण्यासाठी म्हणून भगवंतांनी आपला उजवा हात कमरेवरचा काढून पुढे केला नी लोणी चाटले नंतर तो हात लोणचट म्हणजेच थोडा लोणी लागलेला असल्याने परत कमरेवर ठेवताना हात व्यवस्थित कमरेवर ठेवला नाही म्हणून त्या मूर्तीचा हात असा आहे आणि या मूर्तीच दुसरं वैशिष्ट्य असं आहे की आजही प्रत्येक एकादशीला अभिषेकासाठी मूर्ती खाली घेतली जाते तेव्हा संपूर्ण अभिषेकानंतर मूर्तीला पिढीसाखरेने स्वच्छ पुसलं जातं तेव्हा हाताला ही पुसलं जातं तेव्हा त्या हातावरून हात फिरवला तर आजही लोण्याचा चिकटपणा जाणवतो.

          याच भगवंतांनी नाथांच्या घरी कावडी ने पाणी वाहीले. मूर्तीच्या खांद्यावर पाणी वाहिल्याचे गट्टे आजही दिसतात अशा तीन वैशिष्ठ्याने नटलेली ही विजयी पांडुरंगाची मूर्ती आहे…!

●●○◦ जय-जय राम कृष्ण हरी◦○●

Rohit

संत श्री गजानन महाराज मंदिर, मले. तालुका: हातकणंगले, जिल्हा: कोल्हापूर, महाराष्ट्र. Sant shri. Gajanan Maharaj Mandir, Male. Tal: Hatkanangle Dist: Kolhapur, Maharashtra. PIN: 416118

Leave a Reply