श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित आठवा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.
“श्री गजानन विजय ग्रंथ”
अध्याय आठवा
॥ श्रीगणेशाय नमः ॥
परमपिता परमेश्वराचे स्मरण करून दासगणु महाराज आता आठव्या अध्यायात लिहितात, “हे वसुदेव देवकी नंदना, हे गोप गोपीमन रंजना, हे दुष्टदानवमर्दना, श्रीहरी तू माझ्यावर कृपा कर. कर्मादिकांचे अनुष्ठान, ईश्वर भक्तीचे प्राशन करूनही तुझ्या भक्तीची साधना करण्यास मी कमीच पडतो. तुझी ज्ञान देणारी सर्व शास्त्रे, पोथ्या ह्या बहुतेक संस्कृत भाषेत असल्याने त्यावर भाष्य करण्यास मी असमर्थ आहे व अज्ञानी आहे. मी ज्ञानार्जन कसे करू हे तूच सांग. मला संस्कृतचे ज्ञान नाही. त्यातल्या त्यात मी अल्पबुद्धी व मंदमती आहे. ज्याप्रमाणे कमळातील मकरंद बेडूक चाखू शकत नाही त्याचप्रमाणे माझी स्थिती आहे देवा, तेव्हा तूच आता मला मदत कर. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे पण ते करण्याची सुद्धा माझी कुवत नाही तेव्हा तुझी प्राप्ति मी कशी करू? तेवढं धन पण माझ्याकडे नाही. ही गरिबी सुद्धा तूच माझ्या पदरात बांधली. तीर्थयात्रा करतो म्हटलं तर आता शरीरात तेवढं सामर्थ्य नाही. त्यातच डोळ्यांची नजर सुद्धा कमकुवत झाली आहे.अशा सर्व बाबतीत मी कमी पडत आहे तेव्हा माझे मनोरथ व माझी तुझ्याविषयी असलेली आस्था आता मनातल्या मनातच संपेल असं वाटत आहे.
हे व्यावहारिक दृष्टया जरी ठीक असलं तरी तुझी कृपा झाली तर मी स्वानंदाच्या समुद्रात रात्रंदिवस पोहत राहीन. तुमच्या कृपेचा महिमा थोर आहे. त्याची किंमत अमूल्य आहे. ढगातून पडलेल्या पावसाचे कधी पैसे द्यावे लागतात का? किंवा ढगांनी मनांत आणलच तर ते तळी विहिरी भरून टाकतातच ना? असं आपण बघतो की, खडकातून सुद्धा पाण्याचे पाट वाहाताना दिसतात. तुझ्या अशा ह्या कृपेचा हा दासगणू भुकेला आहे. एखादा घास जरी तोंडात पडला तरी सर्व सुख मिळून मी तृप्त होईन. कारण अमृताचा एखादा कण जरी चाखायला मिळाला तरी सगळे रोग दूर होतात. मागील अध्यायात आपण देशमुख व पाटलातील दुफळी पाहिली.ती दुफळी मुक्कामाला येऊन बसल्याचं आपण पाहिलं. जिथं जिथं म्हणून ही दुफळी असते तिथं तिथं ती सगळ्या सुखांची होळी करून टाकते. क्षयरोग शरीराला जसा ग्रासून टाकतो , तसा दुफळी रोग समाजाला ग्रासून टाकतो व शेवटी सर्व प्रयत्न कमीपडून यमसदनी वाट धरावी लागते.
एकदा असे घडले कि, खंडू पाटलासमोर तळ्याच्या काठावर देशमुखांचा एक नौकर चरचर करुं लागला. खरं म्हणजे पाटील हा गावातील अधिकारी माणूस, पण दोघांच्यात काही मतभेदांमुळे कुरबुर सुरू झाली. त्यातूनच देशमुखांच्या पाठिंब्यावर मर्या महार हा नोकर खंडू पाटलांना उणे उत्तर देऊ लागला. त्यावर खंडू म्हणाले, “ही तुझी काही बोलायची रीत बरोबर नाही. गरिबानं आपली पायरी कधी सोडू नये. उणी उत्तरे बोलण्याचा अधिकार केवळ देशमुखाना आहे पण तुझ्यासारख्या नकट्याचा नाही, हे लक्षात घे.”
तरी मऱ्या महार काही ऐकेना. उलट तो खंडूची आणखीनच चेष्टा करु लागला त्यामुळे खंडू पाटील रागावले. बाचा बाचीचे कारण अगदी क्षुल्लक होते. पाटलांना काही कागदपत्र ठाण्यात पोहोचवायचे होते, ते काम करण्यासाठी पाटील त्याला सांगत होते कि, “तू असाच अकोल्याला जा आणि तहशिलीत हे टपाल पोहोचून ये.” पण गडी काही ऐकेना. तो म्हणाला,
“मी तुमचं टपाल नेणार नाही. तुम्ही कायम देशमुखांच्या माणसालाच आपली कामे सांगत असता. तुमची काम करायला मी काही बांधील नाही. तुमच्या हुकमाला मी शिमग्याच्या बोंबा समजतो. तो हुकूम मी अजिबात पाळणार नाही. असं म्हणून त्यानं तोंडावर हात ठेवून काही आवभाव सुद्धा विपरीत केले व मारण्यासारखा अविर्भाव केला. ते पाहून चिडलेल्या खंडू पाटलाने हातातल्या भरीव वेळूच्या काठीने त्या गड्याच्या हातावर प्रहार केला. आधीच पाटील ताकदवान व त्यात रागारागाने केलेल्या प्रहारामुळे जोराचा मार लागून गड्याचा हात मोडला व तो बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. त्याला तेथेच सोडून पाटील दुसऱ्या गड्याला टपाल द्यायला गेले. त्यानंतर त्या गड्याच्या नातेवाईकांनी त्याला उचलले आणि सरळ देशमुखांच्या घरी घेऊन गेले. त्याचा हात मोडलेला पाहून देशमुखांना आनंद झाला व म्हणाले, कि “वा ! वा ! छान गोष्ट झाली. आपल्याला बदला घेण्याची पर्वणी स्वतःहूनच चालून आली. आता बदला घेण्याचं चांगलं निमित्तच मिळालं. आता ही संधी सोडायला नको. त्यांनी त्या गड्याला तात्काळ कचेरीत नेऊन तिथल्या अधिकाऱ्याला खोटं नाटं काहीतरी सांगून त्याचे कान भरले. कुठंही दोन पक्षात वाकडं आलं की काट्याचे नायटे व्हायला वेळ लागत नाही. येथेही तेच घडले. अधिकाऱ्याने त्या गड्याची तक्रार आपल्या रजिस्टर मध्ये नोंदवून घेतली व पाटलांना पकडून आणायचा हुकूम केला. त्या बरोबर शेगावात सगळीकडे उद्या पाटलांना बेड्या पडणार या एकाच विषयाची चर्चा सुरू झाली. खंडूलाही ते समजलं व त्यामुळे त्याचे धाबे दणाणून गेले. ते घाबरून अत्यंत चिंतातुर झाले. मनात म्हणायला लागले, “ज्या शेगांवात मी आजवर वाघासारखा वावरत होतो त्याच्यावरच देवा हा दुर्धर प्रसंग आणला. इज्जतदार मनुष्याला आपला अपमान मरणाहून भयंकर वाटतो. त्यांचे भाऊही चिंतातूर झाले. खंडू पाटील हताश झाला. एवढ्यात त्यांना गजानन महाराजांना साकडं घालायचा विचार आला व मनीच विचार करू लागला कि “त्या गजानन साधुशिवाय या संकटाचे निरसन करणारा आता या वऱ्हाडात कुणीही नाही.” त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करायला खंडूचे पाटलांचे भाऊ अकोल्याला गेले. खंडू पाटील मात्र रात्री समर्थांकडे आले. आल्याआल्या त्यांनी समर्थांच्या चरणी डोके ठेवून म्हणाले कि,
“महाराज माझ्यावर फार कठीण प्रसंग आला आहे सरकारी कामासाठी, मी हातातल्या काठीने एका गड्याला तळ्याकाठी वेळूच्या काठीने मारलं हे खरं आहे पण त्यामुळं देशमुख मंडळींना माझा काटा काढायची संधीच मिळाली आहे. ते आता ह्या निमित्ताने माझे वाटोळे करतील हे निश्चितच आहे. आता त्याची परिणती म्हणून उद्या मला कैद व्हायची वेळ आली आहे महाराज! आता तुमच्याशिवाय मला कोण वाचवेल? उद्या सरकारी अधिकारी येतील व माझ्या पायात बेडी ठोकून ते मला येथून घेऊन जातील. त्यापेक्षा गुरुराया ही घ्या माझी तलवार व माझा गळा कापून टाका कारण आता माझ्या अब्रूचे धिंडवडे निघणार आहेत. अब्रुदार माणसाला माणसाची बेइज्जती हेच मरण आहे देवा! माझा अपराध तो किती? पण त्या खड्याएव्हढ्या अपराधाचा आज डोंगर झाला. तेव्हा समर्था माझी अब्रू वाचवा हो? जयद्रथाचा वध करू शकला नाही म्हणून अब्रू वाचवायसाठी अर्जुन स्वतःला जाळून घ्यायला निघाला होता. तेथे भगवंताने त्याच्या अब्रूचे रक्षण केले. तसंच द्रौपदीला सभेत वस्त्रे नेसवली. इथं पांचाली रुपी माझ्या अब्रूला कौरवांसारख्या देशमुखांनी हिरावून घ्यायचं ठरवलंय. तेव्हा तुम्ही माझं रक्षण करा. असं म्हणून पाटील ढाय ढाय रडू लागला. डोळ्यातून आसवांचा महापूर निघत होता.
घरचीं माणसे आधीच चिंतातुर झाली होती. त्यांच्या शोकाला काही पारावार राहिला नाही. इकडे खंडू पाटील मुसुमुसु रडतोय हे बघितल्यावर त्याचं सांत्वन करण्यासाठी समर्थांनी दोन्ही हातांनी त्याला कवटाळलं. त्याला आपल्या मिठीत घेऊन हृदयाशी धरून ते म्हणाले, “अरे ! जो काम करतो ना, त्याच्यावर अशी संकटं नेहमी येतातच तेव्हा तू काहीही काळजी करू नकोस. स्वार्थदृष्टी बळावली की हे असंच होतं. अरे हे तत्व आहे. खरी नितीमता आजकाल उरली नाही आणि त्यामुळेच स्वार्थ आणि नीतिमत्ता आतापर्यंत एकत्र नांदू शकल्या नाही. तुम्ही पाटील आणि देशमुख एकाच जातीचे असूनही स्वार्थापोटी एकमेकांचे नुकसान करू बघता.मागें कौरवपांडवांत स्वार्थामुळेच पडदा आला. पांडवांचा पक्ष तेथे न्यायाचा असल्यामुळे भगवंतांनी त्यांना मदत केली व त्यांना सहाय्य करण्यासाठी असत्याचा पक्ष घेऊन लढणाऱ्या कौरवांना त्याना मारावे लागले.”
श्री गजानन महाराज पुढे म्हणाले, “जा , भिऊ नकोस. देशमुखाने कितीही जरी जोर लावला तरी तुला उद्या बेड्या पडणार नाहीत.” तेच पुढे खरे झाले. पाटील निर्दोष सुटले. संतांनी जे वदले ते कधी असत्य होईल का ?
सर्व पाटील मंडळी महाराजांची दिवसेंदिवस जास्तच सेवा करू लागली. सहाजिकच आहे, अमृताचं सेवन करायला कुणाला आवडणार नाही? खंडू पाटलांनी प्रेमाने विनंती करून त्यांना आपल्या घरी रहायला नेले. पाटलांच्या घरी रहात असताना तेथे दहा पाच तेलंगी ब्राह्मण आले. हे ब्राह्मण विद्वान, कर्मठ आणि वेदांतावर वर वर प्रेम दाखविणारे धनलोभी ब्राम्हण होते. महाराजांच्याकडून चांगली दक्षिणा मिळेल या आशेनं ते आले होते. त्यावेळेस महाराज पांघरूण घेऊन निजलेले होते. त्यांना जागं करण्यासाठी, मोठ्या आवाजात ब्राह्मण जटेचे मंत्र स्वरासहित म्हणू लागले. पण मंत्र म्हणताना झालेली चूक त्यांनी दुरुस्त केली नाही म्हणून गजानन महाराजांची स्वारी उठून बसली आणि ब्राह्मणांना म्हणाली, “तुम्ही कशासाठी वैदिक झालात? वेदविद्येला का कमीपणा आणता? ही मोक्षदात्री आहे. ही पोट भरायची विद्या नव्हे. पंडित म्हणून डोक्याला शाल बांधता तर त्याची काही तर किंमत ठेवा. खरे स्वर मनात आणून मी म्हणतोय असं म्हणा. उगीच भोळ्या भाविकांना सोंग निर्माण करून त्यांना फसवू नका.”
असं म्हणून जी ऋचा ब्राह्मणांनी म्हणायला सुरुं केली होती, तोच अध्याय समर्थांनी स्पष्ट शब्दोच्चार करून धडधड म्हणून दाखविला. म्हणण्यांत कुठंही एक चूक सुद्धा नव्हती. ऐकणाऱ्याला एक क्षणी अस वाटल कि एक मूर्तीमंत वसिष्ठ वेद म्हणायला बसले आहेत. ते ऐकून ते तेलंगी ब्राम्हण चकित झाले. समर्थांच्याकडे मान उंच करण्याची त्यांची हिम्मत झाली नाही.ते आपली मान खाली घालून बसले. सुर्योदय झाल्यावर, अंधारात तेवत असलेल्या दिव्यातून प्रकाश कसा निर्माण होईल ? विप्र मनातल्या मनात म्हणाले, “ह्याला लोक वेडा म्हणतात पण हा तर महाज्ञानी आहे. चारही वेद याच्या मुखात प्रत्यक्ष बसलेले आहेत. हा दुसरा कोणी विधाताच आहे यात शंका नको. हा नक्कीच जातीने ब्राह्मण असला पाहिजे. याची परमहंस दीक्षा असल्याने याला कुठलेही बंधन नाही. हा जीवन्मुक्त सिद्धयोगी आहे. काही पुण्य पदरी होतं म्हणून ही दिगंम्बर मूर्ति पहायला मिळाली. याला वामदेव याखेरीज दुसरी उपमा देता येत नाही.
असो, त्या ब्राह्मणांना श्री गजानन महाराजांनी खंडू पाटलांकडून एक एक रुपया दक्षिणा दिली, त्यावर संतुष्ट होऊन ब्राह्मण दुसऱ्या गावाला निघून गेले. महाराज ही गावच्या रोजच्या कटकटीला कंटाळले होते. खर्या संताना कटकटी कधीच नको असतात तर दांभिकाला मात्र त्यांचंच कौतुक वाटतं !
गावाच्या जवळच उत्तरेला एक मळा होता. मळ्यात भाजीपाला भरपूर पिकत असे. लिंबाच्या झाडांच्या थंडगार सावलीत एक शंकराचे देऊळ होते. हा कृष्णाजी पाटलाच्या मालकीचा मळा होता. कृष्णाजी हा खंडूचा सगळ्यात धाकटा भाऊ होता. एके दिवशी महाराज मळ्यात येऊन शंकराच्या देवळाजवळच्या लिंबाच्या झाडाच्या सावलीत कट्टयावर येऊन बसले. ते कृष्णाजीला म्हणाले,
“मी काही दिवस तुझ्या मळ्यात या शंकराजवळ राहातो. तो कर्पूरगौर, नीलकंठ पार्वतीवर असलेला हा भोलानाथ सर्व देवांचा राजराजेश्वर आहे. तो तुझ्या मळ्यांत रमलाय म्हणून मीही विचार केला की, येथे राहू. इथं मला सावली करून दे.” हे वाक्य ऐकल्यावर कृष्णाजीने लगेच सहा पत्रे आणून ओट्यावर छप्पर करून दिले.
समर्थांनी तेथे राहायला सुरुवात केली तेव्हा मळ्याला राजक्षेत्राचं स्वरूप आलं. जिथं राजा राहतो तिथे आपोआपच राजधानी होते. महाराजांचे बरोबर भास्कर पाटील व तुकाराम कोकाटे हे दोघे निरंतर सेवा करायला राहिले होते. खाण्यापिण्याची सगळी तरतूद कृष्णाजी पाटील करत असे.समर्थ जेवल्यावर तो प्रसाद घेत असे. महाराज मळ्यांत असताना एक विचित्र गोष्ट घडली. त्या ठिकाणी फिरत फिरत दहा वीस गोसावी आले. समर्थांचा बोलबाला त्यांनी अगोदरच ऐकलेला असल्याने तेही मळ्यात येऊन राहिले. गोसावी कृष्णा पाटलाना म्हणाले, “आम्ही तिर्थवासी असून भागीरथीला घेऊन रामेश्वरला निघालो आहोत. गंगोत्री, जम्नोत्री, केदारनाथ, हिंगलाज, गिरनार इत्यादि अनेक क्षेत्रे पायी फिरून पहिली आहेत. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोत. आमचे महाराजही आमच्या बरोबर आहेत. त्यांची महती काय वर्णावी ?
ते फार मोठे साधु असून श्रीहरिसुद्धा त्यांचा गुलाम आहे. तुझ्या पूर्वपुण्याईने ही मूर्ती तुझ्या घरी आली आहे तेव्हा आम्हाला शिरापुरीचें जेवण व लागेल तेवढा गांजा दे. आम्ही तीन दिवस राहून चौथ्या दिवशी येथून जाणार आहोत. तेव्हा आनंदानं ही पर्वणी साधून घे.” एवढं सांगून सुद्धा कृष्णा पाटील यांना ते गोसावी साशंक वाटले. ते गोसावी म्हणाले, “तू त्या वेड्या, पिशा, नंग्याला मळ्यात पोसलास मात्र आम्हाला काही देण्यास मागे पुढे पाहात आहेस? तू गाढवाला पोसतोस आणि गायीला लाथा मारतोस ही काय बरे आहे याचा तूच विचार कर म्हणजे तुला कळेल. अरे आम्ही वैराग्य गोसावी आहोत. सर्व वेदांत आमच्या मुखोद्गत आहेत. तुला जर हे पाहायचं असेल तर ते ऐकायला मळ्यांत ये म्हणजे तुला कळेल. गोसाव्यानी कृष्णाजी यांची बुद्धि भ्रष्ट करायचा प्रयत्न केला. पण ते थोडेही विचलित झाले नाही.
ते गोसाव्याना म्हणाले, “उद्यां घालीन शिरापुरीचं जेवण. आज भाकरी आहेत त्याच घेऊन जा आणि गांजाचं म्हणाल तर मळ्यात चालता बोलता कंठनीळ बसला आहे तेव्हा तुम्हाला हवा तेवढा गांजा तेथे मिळेल.” गोसाव्याना सपाटून भूक लागली होती. त्यामुळे त्यांनी पदरात पडलेल्या चुन भाकरी ताब्यात घेतल्या आणि मळ्यात येऊन विहिरीच्या काठावर जेवायला बसले. जेवणे झाल्यावर समर्थांच्या समोरच एका छपरात गोसावी आपापली कडासने लावून बसले. त्यांचा ब्रह्मगिरी नावाचा महंत सायंकाळी भगवद्गीता वाचू लागला. सर्व गोसावी ऐकत बसले होते. गांवांतूनही काही लोक पोथी ऐकायला आले होते.
“नैनं छिन्दन्ति” हा श्लोक निरुपणासाठी घेतला होता. पण ब्रह्मगिरीला कोणताही स्वानुभव नसल्याने तो दांभिकपणे सगळं सांगत होता. गावकऱ्यांनी त्याचे निरूपण ऐकलं पण त्यांना ते अजिबात आवडलं नाही.ते म्हणाले, “हा नुसता शब्दच्छल करत बसला आहे.”
श्री गजानन महाराज सुद्धा गोसाव्याचं प्रवचन ऐकत समोरच बसले होते. प्रवचन संपल्यावर सर्वजण त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून पत्र्याच्या छपरात येऊन बसले. लोक आपसात म्हणत होते कि, “तिथं निरूपण झालं खरं पण स्वानुभवाचा पुरुष हा येथे छपरात बसलाय. तिथे इतिहास ऐकला येथे प्रत्यक्ष भगवंत बघितला.” गोसावी समोरच बसलेला असल्याने त्याला लोक काय बोलतात ते ऐकायला जातच होते. लोकांचं बोलणं ऐकल्यावर त्याला त्यांचा काही रागही आला. सर्व गोसावी गांजा प्यायला पत्र्याच्या छपरात येऊन बसले. गांजाची चिलीम सुरू झाली. इकडे श्रीमहाराज पलंगावर बसले होते आणि भास्कर त्यांना चिलीम भरून प्यायला देत होते. तेवढ्यात अचानकपणे त्या चिलिमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगावर पडली पण हे कुणाच्या लक्षातही आलं नाही. काही वेळाने पलंग पेटून त्यातून धूर निघू लागला. हळूहळू आग चहूकडे पसरली आणि सगळीकडून आगीच्या ज्वाळा निघू लागल्या. तो प्रकार पाहून भास्कर म्हणाले, “सद्गुरुनाथा, लवकर पलंगावरून खाली उत्तरा. पलंगाची लाकडे सागाची असल्यानं ती पाणी टाकल्याशिवाय विझणार नाही.”
त्यावर महाराज म्हणाले, “भास्करा, पाणी आणून आग अजिबात विझवू नको.”
असं म्हणून ते ब्रह्मगिरी गोसाव्याला म्हणाले, “अहो महाराज ब्रह्मगिरी या आणि पलंगावर बसा. तुम्हाला भगवद्गीता सर्वतोपरी अवगत आहेच. आता त्याच्या परीक्षेची वेळ ईश्वराने तात्काळ आणली.”
हे ऐकून ब्रह्मगिरी घाबरला आणि जळत्या पलंगावर बसायला मनाई करू लागला.
महाराज म्हणाले, “ब्रह्मा न जाळी अनळ याचं प्रत्यन्तर दाखवा नैनं छिन्दन्ति श्लोकावर एक प्रहरभर व्याख्यान केलंत आता का घाबरलास? “असं म्हणून ते भास्करांना म्हणाले, “जा लवकर व ब्रह्मगिरीना हाताला धरून आदरानं येथे घेऊन ये.” महाराजांची आज्ञा ऐकताच भास्कर धावले आणि ब्रह्मगिरीचा उजवा हात त्यांनी धरला. भास्कर मुळातच धिप्पाड आणि सशक्त होते. त्यामुळं गोसावी त्यांच्यापुढं छटपटू लागला. इकडे पलंग चौफेर बाजूनी पेटला. ज्वाळा निघू लागल्या पण महाराज जराही न हालता पलंगावर स्थिर बसले होते. भागवत पुराणा मध्ये श्री व्यासांनी सांगितले आहे कि कयाधूसुत श्रीप्रल्हादाला अग्नीत उभा केला होता. त्याचंच प्रत्यंतर कृष्णाजीच्या मळ्यात श्रीगजानन महाराजांनी दाखवलं. ब्रह्मगिरी भास्कराना विनवीत होता व म्हणत होता कि, “अहो, मला पलंगापाशी घेऊन जाऊ नका. महाराजांचा अधिकार मी ओळखला नव्हता.”
पण भास्करांनी त्याचं मुळीच ऐकलं नाही. त्याला त्यांनी फरफर ओढत आणून “श्री” च्या समोर उभा केला.
“अहो महाराज, नैनं दहति पावक, हे खरे करुन दाखवा.”
असं समर्थांनी म्हंटल्याबरोबर गोसावी घाबरला व तो भीत भीत म्हणाला, “अहो मी पोटभर्या संत आहे. शिरापुरी खाण्यासाठी मी गोसावी झालो. शांतीधामा, माझ्या अपराधाची क्षमा करा. गीताशास्त्र शिकवण्याचा उगीचच खटाटोप करत होतो. तुम्हाला वेडा म्हणालो, त्याचा आता पश्चाताप होतो. मी तुम्हाला दाती तृण धरून शरण आलोय. तेव्हा मला अभय द्या.
“शेगांवचे लोक हा सर्व प्रकार पहात होतेच. त्यांनी समर्थांना विनवणी केली. “आपणाला अग्नीपासून भय नाही हे खरं असलं, तरी महाराज आमच्याकरीता खाली उतरा. तुम्हाला अशा स्थितीत पाहून आम्हांला धडकी भरते. म्हणून ज्ञानजेठी आमच्यासाठी खाली उतरा.” गोसावी आधीच खजील झाला होता. तो काहीच बोलला नाही. लोकांच्या विनंतीला मान देऊन गजानन महाराज खाली उतरले. त्याबरोबर पलंग कोसळून पडला. तो जवळजवळ सगळा जळालेलाच होता. जो थोडासा भाग उरला होता तो लोकांनी विझवला आणि घडलेल्या प्रसंगाची साक्ष म्हणून ठेऊन दिला.
निराभिमानी झालेल्या ब्रह्मगिरीने महाराजांचे चरण पकडले. एकदा गंगाजलाचा स्पर्श झाल्यावर तिथं मळ राहीलच कसा ? मग मध्यरात्री ब्रह्मगिरीला महाराजांनी बोध केला. म्हणाले, “आजपासून तू या चेष्टेला सोडून दे. ज्यांनी राख लावलेली आहे त्यानं इतर आवरणं दूर ठेवावीत. स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कोणतीही गोष्ट इतरांना सांगू नये. जगात नुसत्या शब्दपांडित्यानं थैमान घातलं व त्यानंच आपल्या संस्कृतीचा संपूर्ण घात झाला. गोसावी मच्छिंद्र जालंदर, गोरख गहिनी, ज्ञानेश्वर यांचा अधिकार किती म्हणून सांगू? श्रीशंकराचार्य स्वानुभवाचा पहाड होते तर प्रपंचात राहून ब्रह्मस्थिति एकनाथांनी अनुभविली. ब्रह्मचारीे स्वामी समर्थही ब्रह्मसाक्षात्कारी होऊन गेले. या सर्वांची चरित्रे मनात आण आणि उगीच शिरापुरी खाण्यासाठी भूमीवर भटकत फिरू नकोस. त्यापासून तुला काहीच मिळणार नाही. असा बोध ऐकुन ब्रह्मगिरी विरक्त झाला आणि पहाटेच कुणालाही न भेटता शिष्यांसह निघून गेला.
झाल्या प्रसंगाची वार्ता दुसर्या दिवशी सगळ्या गावाला कळली. जो तो जळलेल्या पलंगाला पहायला मळ्यात आला आणि आश्चर्यचकित झाला.
येथे श्री संत कवी दासगणू विरचित गजानन विजय ग्रंथाचा हा आठवा अद्याय समाप्त होत असून ह्या अध्यायाच्या सामर्थ्याने भाविकांना ससाररूपी समुद्रातून तारून नेवो अशी इच्छा व्यक्त करून संत श्रीदासगणु महाराज
आठवा अध्याय सुफळ संपूर्ण करतात.