श्री दासगणू विरचित ” श्री गजानन विजय ” ग्रंथाचा मराठी अनुवादित वीसावा अध्याय देत असताना सर्वप्रथम मी श्री संत गजानन महाराज व श्री संत कवी श्री दासगणू महाराजांचे चरण वंदितो.

“श्री गजानन विजय ग्रंथ”

अध्याय वीसावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥

संतकवी दासगणू महाराज विसावा अध्याय आरंभ करण्यापूर्वी विठोबारायांची  स्तुती करतात  व  म्हणतात, “हे रुक्मिणीवरा, चंद्रभागा तटविहारा, देवा वरदपाणी माझ्या मस्तकावर तुमचा हात असू द्या. तूम्ही भूपांचे भूपती आहात. आता सर्व काही तुमच्याच हाती आहे. मग माझी फजीती का बरं करता?  तुमचे भजन करण्यासाठी  माझे पापताप  व दैन्य नष्ट करून माझ्यावर कृपा करा. यात जर तुम्ही यत्किंचितही फरक केला तर तुम्हाला वृथा दोष लागेल. खर्‍या थोरांनी स्वतःला बट्टा लावून घेऊ नये. म्हणून हे श्यामसुंदरा, राही रुक्मिणीवरा, पांडुरंगा परमउदारा, माझी इच्छा पूर्ण करा.” श्री गजानन महाराजानी  समाधी घेतल्यावर आता या शेगावमध्ये काय  राहीलं? असं सर्वजण म्हणू लागले. शेगावीचा ज्ञानमयी आता अस्ताला गेला आहे. आता येथे केवळ माती राहिली आहे. समुद्राचे पाणी आटल्यावर  किंवा जेव्हा  पुष्पतरूचा बहर संपतो तेव्हा या जगात त्याचे कौतुक कोण करेल ? आता शेगांवची वारी कोण करणार ? देवच जर देव्हार्‍यात नसेल तर उगीच माळा बांधून त्याचा उपयोग तरी काय ? असे सर्वच जण चर्चा करीत असे. पण ती केवळ कोरी कल्पना होय. कारण अदृश्यपणे महाराजांचा वास व दिव्य ज्योत शेगावात आहे. जसे इंद्रायणीचे तिरावर ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ झाले असले तरी ते भक्तांना तेथेच भेटले आहेत. त्याचप्रमाणे शेगावात श्री गजानन महाराज समर्थ आपल्या भक्तांना  भेटतात असा ज्यांचा दृढ विश्वास आहे त्यांना महाराज  स्वयंमेव दर्शन देतात.

 श्री गणपतराव कोठाडे नावाचे एक भाविक गृहस्थ होते. हे शेगावातल्या दुकानात रायली कंपनीचे एजंट म्हणून काम करत होते. ते महाराजांच्या दर्शनाला  रोज नित्यनेमाने संध्याकाळी मठात येत असत व समाधीपाशी बसून एकनिष्ठेने महाराजांचे स्तवन करीत असे. एकदा त्यांच्या मनात अस आलं की , येत्या विजयादशमीच्या दिवशी समाधीला अभिषेक करून ब्राह्मणभोजन घालावे. म्हणून त्यांनीअभिषेकाची पूर्ण तयारी केली होती. भोजनसामुग्री म्हणून मोठ्या प्रमाणांत शिधा मठात पाठवला. ते पाहून त्यांची पत्नी त्यांना म्हणाली , ” अहो हे तुम्ही काय करता ? तुम्ही अनाठायी खर्च करता ? तुमच्या हाताला काही हाड नाही.उद्या विजयादशमीचा सण आहे म्हणून मुला बाळांना काही कपडे तरी घ्या. वारंवार  हे अभिषेक व ब्राह्मणभोजने करणे काही योग्य नाही. आपल्याला ईश्वराने चार पोरेबाळे दिलीत. मी लंकेची पार्वती आहे. माझ्या अंगावर फुटका मणी नाही. ही काय गृहस्थाची रीत आहे ? थोडं धन तरी हाती पायी राहायला पाहिजे ” हे कांतेचे भाषण गणपतरावाना अजिबात आवडले नाही. मात्र गणपतरावांना प्रपंचाहून परमार्थ श्रेष्ठ वाटत होता. 

त्याच रात्री त्यांच्या पत्नीला स्वप्न पडले व श्री गजानन महाराज स्वप्नात येऊन तिला म्हणाले,  “तू उगाच पतीला छळू नकोस. तो जे जे करतोय ते करू दे त्याला.त्यात तुझ्या बापाचे काय जाते ? वेडे अशाश्वताचे प्रेम बाळगू नको. यामध्ये काही सार नाही. येथील धन येथेच राहणार आहे. मात्र आपलं पाप पुण्य आपल्या बरोबरच येतं. अभिषेक ब्राह्मणभोजन हे पारमार्थिक पुण्य आहे. त्यासाठी खर्च केला तर तो बेकार जाणार नाही. पेरलेल्या बीजाप्रमाणे त्याची स्थिती होते. म्हणून पोरी, तो जे करतोय ते त्याला करू दे. तू उगीच अडथळा करू नकोस.”

 हे स्वप्न जेव्हा तिनं आपल्या पतीला सांगितलं तेव्हा ते ऐकून गणपतरावना हर्ष झाला. ते पत्नीला म्हणाले, “महाराज येथेच आहेत. त्याचं तुला आता प्रत्यन्तर आलं ना? आता कुविचार करणं सोडून दे. अगं मुलं, धनदौलत हे सर्व गजानन महाराजांचे आहे. त्यामुळे त्यांची सर्व चिंता त्यांना असल्याने तू काळजी करू नकोस.” 

 गणपतरावांनी दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर आनंदाने पूजन केले. खर्चही उत्तम केला. या गणपतरावांची  समर्थपदी शुध्द स्वरूपाची निष्ठा अगोदर पासूनच जडली होती.  लक्ष्मण हरी जांजळ यांना एकदा असाच अनुभव आला.ते बोरीबंदर स्टेशनवर काही कामानिमित्त मुंबईला जाण्यासाठी आले होते. ते  अगोदरपासूनच श्री गजानन महाराजांचे भक्त होते. परंतु वारंवार येणाऱ्या घरच्या कटकटीने वैतागुन गेले होते. आता मात्र ते व्यापाराच्या संबंधात ते मुंबईस आले होते. काम झाल्यावर घरी जाण्यासाठी म्हणून ते जेव्हा बोरीबंदर स्टेशनवर आले तेव्हा तेथे त्यांना एक परमहंस भेटले. ते आजानुबाहु व  उंच बांध्याचे होते. त्यांची दृष्टि नासाग्री होती व त्यांच्या मुख़ातून ओंकाराचा जप चालला होता. ते लक्ष्मणाना म्हणाले, “तूं गजाननाचा शिष्य आहेस ना, मग असा हताश का होतोस तेच मला कळत नाही. तू आपुल्या घरी उमरावतीला चारशे पानांची तयारी केली होतीस ना? त्यावेळी गोपाळराव पेठकर आणि बापटमास्तर यांचा प्रकार काय घडला ते तू आता आठव बरं? बापटाला पुत्रशोक झाला असून सुद्धा तो प्रसादाला तुझ्या घरी आला होता ना? पेठकराचे ब्राह्मण भोजन कशाने राहिले? अरे गजानन स्वामी त्या उभयतांच्या स्वप्नांत गेले होते. त्यांनी दोघांनाही उपदेश करून प्रसादाला आणले होते. हे कसे विसरलास?

 “खुणेच्या गोष्टी ऐकून लक्ष्मण साशंक झाले व मनात म्हणाले, “हा कोण आहे काही कळत नाही.” लक्ष्मणानी त्या परमहंस संन्याशाला आदराने नमस्कार केला व तेवढ्यात लगेच तो परमहंस गुप्त झाला. मग लक्ष्मण घरी येऊन अगोदरसारखे वागूं लागले. दरवर्षी त्यांनी त्यांच्या घरी  श्री गजानन महाराजांची पुण्यतिथी साजरी करायला प्रारंभ केला. 

अवधूत जयराम खेडकराना राहीतसाहीत गावाला पुण्यराशी संन्याशाच्या वेषात भेटले होते. माधव मार्तंड जोशी हे कळंब कसूर गावी मोजणी करायला आले होते. ते रेव्हेन्यु आँफिसर होते. त्यांचा गजानन महाराजांवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी दिवसभर मोजणीचे कामे केलीत व संध्याकाळी त्यांची शेगावास जाण्याची इच्छा झाली व मनात म्हणाले,  “आज गुरुवार आहे. समर्थाचे दर्शन घेऊ.” त्यांनी शिपायाला दमणी तयार करण्याची आज्ञा केली व  म्हणाले कि, “चल  आता शेगावला जाऊ व  रात्री तिथंच मुक्काम करून सकाळी परत येऊ.” तेव्हा शिपाई कुतुबुद्दीन हात जोडून बोलला, “आभाळ भरून आलेलं दिसत आहे याचा आपण विचार करावा. मन नदीला गढूळ पाणी भरपूर आलंय  म्हणून विनंती केली.

त्यावर जोशी म्हणाले, “अरे, आत्ताच नदीपार होऊ. जा आता दमणी तयार कर. उगीच सबबी सांगूं नको.” ते ऐकून शिपाई लगेच दमणी तयार करून  घेऊन आला. जोशी दमणीत बसून शेगावला  जाऊं लागले. पण दमणी जशी नदीत वळविली तशीच  त्या नदीला अचानक पाणी आले. बैलांना पैल तिरापर्यंत जायला सुध्दा वेळ मिळाला नाही. वाऱ्याचा झंझावात बळावला. कडकडाट करत विजा चमकू लागल्या. मन नदीला क्षणात मोठा पूर आला. ढग मुसळधार बरसू लागले. जोरजोरात सुटलेल्या वाऱ्याने शेतकर्‍यांची छपरे उडू  लागली. शिपाई कुतुबुद्दीन म्हणाला, “साहेब, आपल्याला आता येथेच मरण येणार! आता काहीही उपाय उरला दिसत नाही. माधव मार्तंड जोशी सुद्धा मनातल्या मनात घाबरून गेले व करुणामयी वचनाने श्री गजानन महाराजांची  प्रार्थना करू लागले व म्हणाले, “हे समर्था, गजानना आता तुम्हीच आमच्या प्राणांचे रक्षण करा. अशा जीवघेण्या संकटात तुझ्याविना आम्हाला कोण त्राता आहे? पुराणात कथा ऐकली आहे की , समुद्रात जहाज बुडताना संतांनी हात देऊन रक्षण केले तसेच आता तुम्हीही आम्हाला या संकटातून वाचवा व या पुरामधून आमचे रक्षण करा.”

ते अशी प्रार्थना करत असताना दमणीत पाणी शिरले. त्यामुळे बैल घाबरून गेले. ते पाहून जोशी शिपायास म्हणाले, “तूं आता मागे हो व गजानन महाराजांचे भजन कर. आता तेच आपल्याला भवपार करतील. आता तू चिंता करू नकोस.” पुढं जोशी महाराजाना  म्हणाले, “समर्था तुझी सत्ता अगाध आहे. आता तुला जे वाटेल तसं तू कर. आम्हाला तार अथवा मार.”  असं म्हणून त्यांनी शिपायाला कासरा सोडून देण्यास सांगितले आणि दोघेही डोळे मिटून बसले. तेवढ्यात चमत्कार झाला. अशा महापुरातून दमणी निर्विघनपणे पैलतटावरील शेगावच्या सडकेवर जाऊन उभी राहिली. हा प्रकार पाहून उभयतांना आनंद झाला. अवलिया महाराजांची केवढी अगाध सत्ता आहे हे पहा. भक्तांना बुडू न देता पुरातून त्यांचे रक्षण केले. घटकाभर रात्र झाली असताना जोशी शेगावात आले. समाधीला वंदन करून पालखीचा सोहळा पाहिला. दुसरे दिवशी जोशानी खूप दानधर्म केला. बाळाभाऊ जवळ ब्राह्मण भोजन घालण्यासाठी अत्यानंदाने काही रुपये दिले. त्यांना सर्व घटना सांगितल्या व म्हणाले, “मी नवस केलाय. त्याप्रित्यर्थ माझ्यासाठी तुम्ही ब्राह्मण भोजन घाला. कारण जरुरीचे काम असल्याने मला वेळ नाही.” असे म्हणून जोशी निघून गेले. 

हिंगणीचे यादव गणेश सुभेदार हे कापसाचे व्यापारी होते. एके वर्षी त्यांना दहा हजार रुपये तोटा झाला. त्या चिंतेने ते चिंताग्रस्त झाले. त्यांना काही सुचेनाच झालं  पण त्यांना व्यापारही सोडवायचा नव्हता असं जरी असलं जरी मनातली चिंता तशीच राहीली,  कारण मनाप्रमाणे फायदा होत नव्हता. व्यापारी स्वस्थ न बसता नेहमीच फायद्यासाठी नाना प्रकारे खटपट करत असतात. ते एकदा वर्ध्यांत काही कामानिमित्त आले असताना विनायक असिरकरांच्या घरी गेले. तेथे भिक्षा मागण्यासाठी एक भिकारी आला. मराठी माणसासारखा त्याचा पोशाख होता. त्याच्या हातात मोठी काठी होती आणि डोक्याला मळकट मोठी टोपी होती.  त्याच्या शरीराला कंप सुटला होता. असिरकर त्याला अतिशय रागाने म्हणाले, “मागील दारी जा बेटा तिथं तुला भिक्षा मिळेल. यावेळी तू ओसरीची पायरी चढू नकोस. पण भिक्षेकऱ्याने अजिबात ऐकले नाही. तो तसाच ओसरीवर येऊन यादवांजवळ बसला. त्यांना म्हणाला, “काहीतरी भिक्षा घाल.” असे म्हणून  त्याने यादव सुभेदारांच्या पुढे भिक्षापात्र धरले.हे पाहून यादव मनात म्हणाले, “हा भिकारी फारच लोचट दिसतो  नको नको म्हणत असताना येथे येऊन बसलाच” असं म्हणून ते भिकाऱ्याला न्याहाळून पहात असताना त्यांना तो शेगावचे राजयोगी गजानन महाराजांसारखा दिसला. त्याचे डोळे अत्यंत तेजस्वी होते. आवाजही त्यांच्यासारखाच होता. पण शरीर मात्र थरथर कापत होते.  चेहऱ्यावर तेज आणि बोलणं मात्र श्री गजानन महाराजांसारखं होतं. ते पाहून सुभेदार मनात म्हणाले, “ह्याला जर गजानन मानू तर ते केव्हाच समाधिस्थ झाले आहेत. आता महाराज आम्हाला कोठून दिसणार ? काहीही असो. भिकारी असला तरी श्री गजानन महाराज समजून दोन पैसे देऊ. उगीच उहापोह नको.” त्यांनी दिलेले पैसे भिकार्‍याने घेतले आणि म्हणाला, “आणखी काही दे! श्री गजानना महाराजांसाठी  गुळाची शेरणी वाटण्याचे वरचेवर वायदे करत होतास ना? आता मात्र मी ऐकणार नाही. तुला व्यापारात दहा हजाराचा तोटा झाला ना? त्याचा अंतरी विचार करून काही रुपये मला लवकर दे! काढ पाकीट खिशातून !”

 भिकारी असं बोलल्यावर सुभेदारांनी कांहीं रुपये पाकिटातून काढून दिले. पण भिकारी म्हणाला,  “एवढ्यावर मी संतुष्ट होत नाही. लवकर आणखी रुपये काढून मला दे!” सुभेदारांनी पुन्हा रुपये काढले व भिकाऱ्याला दिले. तेवढ्यात विनायकराव असिरकर ओसरीवरून उठून घरात गेले. यादवराव एकटेच असिरकरांच्या ओसरीवर आहेत असे पाहून भिकारी त्यांना म्हणाला, “गजानना विषयी  मनात संशय का घेतोस ? माझ्यापुढं कपडे काढून उभा रहा बरं! तुझ्या अवघ्या अंगावर माझी दृष्टि एकदा पडूं दे म्हणजे तुझी व्याधि दूर होईल. अरे तू मला मुलासारखा आहेस. मग का लाजतोस?” असं म्हणून त्याने त्यांच्या पाठीवरून हात ठेऊन सर्वांगावरून फिरविला. तेवढ्यात असिरकर ओसरीवर आले. दिलेले पैसे घेऊन भिक्षेकरी निघून गेला. यादवानी त्याचा बराच तपास केला. पण काही ठावठिकाणा लागला नाही. शेवटी त्यानी मनोमन ठरवून टाकलं की, ते निश्चित गजानन महाराजच असावेत. पुढं मनात विचार आला, “हे जर स्वामी गजानन असतील तर आज व्यापारात नक्की फायदा होईल.” त्यादिवशी सुभेदारांच्या कापसाला वर्ध्याच्या बाजारात खूप किंमत मिळाली. ते पाहून यादव समाधानी झाले. आता त्यांची खात्रीच पटली की, तो भेटलेला भिकारी हे समर्थ श्री गजानन योगीराज होते.

 समर्थ आपल्या भक्तांचं अहर्निशीं रक्षण करत असतात. त्यांच्याविषयी दृढतर निष्ठा मात्र पाहिजे. खामगावला भाऊ राजाराम कवर डॉक्टर होते. त्यांची तेल्हार्‍याला बदली झाल्याने तेथे जाण्यासाठी ते खामगांवाहून सहकुटुंब निघाले होते. त्यांनी तेल्हार्‍याची गाडी करून निघण्याची तयारी केली. संध्याकाळची वेळ होती. जाण्यापूर्वी  ते “श्रीं” चे दर्शन घ्यायला ते मठात आले. बाळाभाऊ मठाधिपती होते. ते म्हणाले, “अहो माझी विनंती ऐका. तुम्ही उद्या प्रसाद घेऊन जा! आजपर्यंत कधी प्रसाद न घेता गेला नाहीत. मग आज असं विपरीत मनात का आणलंत? त्यात आज व्यतिपात आहे हे लक्षात घ्या.” त्यावर कवर म्हणाले, “मला फार घाई आहे. आज रात्री प्रसाद घेतो व मग लगेच जाईन. तुम्ही यावेळी मला नसता आग्रह करू नका.”

 असं म्हणून झाल्यावर ते मुलांमाणसांना घेऊन, दमणीत बसून तेल्हार्‍याला निघाले. सर्वत्र अंधार दाटला होता. त्यात चमत्कार म्हणजे गाडीवान तेल्हार्‍याचा रस्ता चुकला. कुणाकडे चौकशी करावी म्हंटलं तर कुणी भेटलंही नाही. गाडी अरुंद रस्त्यावरून चालली होती. शेवटी ती एका भव्य तलावाच्या काठावर येऊन उभी राहिली. गाडीवाला म्हणाला, “साहेब रस्ता चुकलाय.” हे ऐकून कवराना आश्चर्य वाटले. खाली उतरून पहातात तो सर्व वेगळंच दिसलं. रागारागाने ते त्या गाडीवाल्याला बरंच ओरडले. म्हणाले, “अरे, तू तेल्हार्‍याचा म्हणून तुझी गाडी केली आणि तूच आम्हाला असा आडमार्ग दाखवलास. काय दारू बिरु पिवून रस्ता चुकलास का ? तुझ्या डोळ्यांना वाट कशी काय दिसली नाही. तूच म्हणाला होतास ना, कि, तू नेहमी तेल्हार्‍याला जात येत असतोस,  म्हणूनच तर तुझी गाडी केली. मग आडमार्गावर गाडी कशी आणलीस तू?”

त्यावर गाडीवाला हात जोडून म्हणला, “मला का ओरडता हो? मी काही अपराध केलेला नाही. मी नेहमीच भाडे करतो. तेल्हार्‍याहून येथे येतो. वाटेल तेव्हा गाडी हाकतो. मला सर्व रस्ता माहीत आहे. बैलही कोठे इकडे तिकडे वळले नाहीत पण तलाव पाहून बावरले. कारण हा रस्ता तेल्हार्‍याचा नाही.” हे सगळं ऐकल्यावर कवर मनात काय ते समजले. म्हणाले, “हे  केवळ महाराजांचं  कृत्य आहे. बाळाभाऊंच्या विनंतीला मान न देता, मी प्रसाद घेतल्याशिवाय निघालो म्हणून माझा रस्ता चुकलाय. पण आता वाट कशी सापडणार?” या घनघोर अरण्यात माझे रक्षण करण्यासाठी महाराज तुमच्याशिवाय मला कोण त्राता आहे?” ते अशी विनवणी करत असतानाच तळ्याच्या दुसऱ्या बाजूला  घागरमाळांचा आवाज झाला. तो ऐकल्यावर मात्र डॉक्टराना थोडा धीर आला. ते गाडीवानाला म्हणाले, “येथून रस्ता फार दूर नसावा” घागरमाळाच्या आवाजाच्या चाहुलीने गाडी पुढे हाक. कवरांचे म्हणणे ऐकून त्याने गाडी हाकली. कांट्यांकुपाट्यांमधून काढून नीट रस्त्याला लावली. हमरस्ता लागल्यावर  डाँक्टरांनी चौकशी केली तेव्हा समजले की, हे शेगावचेच शिवार आहे. मग  डाँक्टर गाडीवानाला म्हणाले, “चल शेगावी परत जाऊ. सूर्योदयाच्या वेळी कवर शेगावात आले आणि त्यांनी सर्व वृत्तांत बाळाभाऊना निवेदन केला. बाळाभाऊ म्हणाले  “हेच बरे झाले. समर्थांनी तुम्हाला व्यतिपाती जाऊ दिले नाही. आज प्रसाद ग्रहण करून उद्या तेल्हाऱ्याला जा. प्रसाद कधी नाकारू नये. तुम्ही श्री गजानन भक्त आहात म्हणून तुम्हाला परत आणले. माणसाचे सगळेच बेत पूर्ण होणे हे काही शक्य नसते,  संतांच्या जे मनात असेल तेच घडून येते, म्हणून  त्यांच्या चरणी भरवसा ठेवून निश्चित असावं.” दुसरे दिवशीं प्रसाद घेऊन कवर तेल्हार्‍याला गेले.

 एक रतनसा नावाचे भावसार जातीचे गृहस्थ होते. त्यांचा मुलगा दिनकर एक वर्षाचा असताना त्याला सोबणीचा रोग झाला. कोणी म्हणू लागले आता हा गेला. अंगात रक्त न राहिल्याने मूल अगदी सुकून गेलं. हाडंकातडं एक झालं. मोठमोठ्या वैद्यांनी उपचार केले पण काहीएक उपयोग झाला नाही. मूल काही रडायचं थांबेना. दूधपाणी घेईना आणि त्याचा तापही कमी होत नव्हता. वैद्य रतनसाना म्हणाले, “आता याला काही औषध देऊ नका. हा तुमच्या हाताला लागणे अशक्य आहे. सुज्ञ मनाने नेहमी तंतोतंत विचार करावा. उगीच सागरावर पूल बांधायला जाऊं नये!”

हे ऐकून रतनसा ढसाढसा रडूं आलं. दिनकराचा अंतकाळ आता अगदी जवळ आला होता. घरची सर्व माणसे रडू लागली. दिनकराचे हातपाय गार पडले. डोळ्यातले तेज मंदावले. मनगटाला नाडी लागेनाशी झाली. शेवटी रतनसानी मनात असा विचार केला की, आता कसही करून  मुलगा जाणारच आहे पण आता माझ्याजवक  एक शेवटचा उपाय आहे तो करून बघतो, असं म्हणून त्यांनी हातात मुलाला उचलून घेतले व महाराजांच्या पुढे नेऊन ठेवले. पुढे नवस केला की, मुलगा जर बरा झाला तर मी पांच रुपयांची शेरणी वाटीन. तुम्ही सर्वांच्या नवसाला पावता तो अनुभव मलाही येऊ द्या. मीही तुमचाच आहे. माझी उपेक्षा करू नका. माझे मूल जर तुमच्या दारी मृत झाले तर अवघ्या वर्‍हाडांत तुमची  नाचक्की होईल. तुमचे चरण अमृतापरी आहेत असं सर्वजण सांगतात. तेव्हा हे स्वामी गजानना या बालकावर कृपा करा. माझा मुलगा या आजारातून उठला नाही तर मी तुमच्या पायावर डोके फोडीन असा माझा निश्चय आहे. तुमच्या अमृततुल्य दृष्टीची आज माझ्या मुलावर वृष्टी करा. महापुरुषा गजानना! माझ्यावर कृपा करा. थोडावेळ गेल्यावर मूल हातापाय हालवायला लागले. नाडी ठिकाणावर आली. मूल रडू लागले ते पाहून सर्वजण आनंदीत झाले. समर्थकृपा झाल्यावर दिनकर थोड्याच  दिवसांत पूर्वतत झाला. श्रध्दायुक्त नवस नक्कीच फळ देतो.

 दादा कोल्हटकरांचा राजा नांवाचा पुत्र हा समर्थांचा प्रसादच आहे. संतकृपा ही खरोखरच अमोल असते.  रामचंद्र पाटलांची चंद्रभागा नांवाची कन्या होती. तिला लाडेगावला दिली होती. ती गरोदर असताना तिच्यावर प्रसूतीच्या वेळी दुर्धर प्रसंग आला. प्रसुतीची वेळ स्त्री जातीला फार कठीण असते. मोठ्या कष्टाने तिची प्रसूती झाली पण लगेच चंद्रभागेला ज्वर चढला. तो नवज्वर होता. पाटलांनी औषध उपचार खूप केले. सगळे डॉक्टरी उपचार करून  तेवढ्यापुरते बरे वाटे पण आजार मात्र नामशेष होईना. त्यामुळे चंद्रभागा वरचेवर आजारी पडूं लागली. एकदा अकोल्याला औषधोपचार करण्यासाठी तिला नेलं. पण निरनिराळ्या वैद्यांची निरनिराळी मते पडली. कोणी नळसंग्रहणी म्हणायचे, कोणी म्हणत क्षय झाला असे म्हणायचे.  मग पाटलानी ठरवलं की, आतां वैद्य गजानन! तारो अथवा मारो. हिला रोज अंगारा लावावा, तीर्थ द्यावे. वडिलांची श्री गजानन महाराजांवर खूप मोठी निष्ठा होती. हळूहळू त्यांच्या मुलीला गुण येऊ लागला. ज्या मुलीला शय्येवरून उठवत नव्हते तीच पायी चालत दर्शनासाठी मठात आली, असे अंगार्‍याचे महत्त्व आहे. ज्याची निष्ठा भावपूर्ण आहे त्यालाच  देव पावतो. उपासकानं उपास्यपदी भाव ठेवावा. रामचंद्रांची पत्नी जानकाबाई सुलक्षणा होती. पण दैवयोग भोगल्यांवाचुन कुणाला चुकतो काय? त्यांना वाताचा विकार झाला. त्यामुळे वरचेवर पोट दुखत असे पण कुठलाच उपाय चालेना. औषधाने तेवढ्यापुरतं बरं वाटायचं पण औषध संपलं की, व्याधी पूर्ववत जशीच्या तशीच व्हावयाची.असं फार दिवस चालू होतं. शेवटी तो वात डोक्यात शिरून मेंदु  बिघडला. चांगलं वाईट कळायचं बंद झालं. त्यामुळे वेड्यासारखं वर्तन होत असे. वाटेल ते बोलत, कधी उपाशी निजत, कधी जेवतच बसत. कुणी म्हणायचं यांच्या मानगुटीवर भूत बसलंय, कुणी म्हणायचं रोग लागलाय, कुणी सांगायचं ही करणी आहे. कारण जमीनदार म्हंटलं की, त्याच्या वाईटावर लोक असायचेच आणि ते त्यांचा जोर चेटूक करणी करून दाखवतात. औषध उपचार फार केले. जाणत्यां कडून गंडे दोरे जानकाबाईंच्या हातात बांधले. पाटील घरचे श्रीमंत असले तरी अडचणीत सापडले होते. म्हणून दांभिकांना ऊत आला. कुणी त्यांच्याकडून धन मिळवण्यासाठी अंगात आल्यासारखं करून काहीतरी निदान करत. ते बिचारे सर्व करत. पण पत्नी काही बरी होईना. शेवटी त्यांनी ठरवले कि आतां माझ्यासाठी वैद्य, जाणते, देवऋषि सर्वकाही गजानन महाराजच आहेत. त्याना जस वाटेल ते करोत. माझी बायको त्यांची सून आहे अशी माझी  भावना आहे. मला आता अन्य उपायांची गरज नाही.ते पत्नीला म्हणाले, “तूं उद्यापासून प्रातःकाळी स्नान करून मठात जाऊन समाधीला प्रदक्षिणा घाल. तिने पतीचे वचन सर्वथैव मान्य केले आणि समर्थांच्या समाधीभोवती ती प्रदक्षिणा घालू लागली. त्या मात्र वाया गेल्या नाहीत. सद्गुरुरायाना दया आली आणि वातविकार बरा झाला. खर्‍या संतांची सेवा कधीच वाया जात नाही. ही गोष्ट माहीत असली तरी माणसांची संतांवर निष्ठा बसणं अशक्यच असते. समर्थांच्यानंतर बाळाभाऊ गादीवर बसले. त्यांचे काही चमत्कार झाले. हे वैशाख वद्य षष्ठीसी शेगावातच वैकुंठाला गेले. त्यानंतर नारायण गादीवर बसले. बाळाभाऊ जेव्हा गेले तेव्हा नांदुरे गावच्या नारायणरावांना स्वप्न पडले. गजानन महाराज त्यांच्या स्वप्नात गेले व म्हणाले, 

“हे नारायणा, भाविक जनांना रक्षण्यासाठी तूं शेगांवला जा.”

 त्याप्रमाणे नारायण शेगावला गेले. काही दिवस यांनीही अधिकार चालविला. यांची समाधि चैत्र शुध्द षष्ठीला शेगावला झाली. पूर्वसुकृत असल्याशिवाय  संतसेवा घडत नाही कारण संतसेवेचे पुण्य फार महान असते. त्याची कल्पना सहजी येत नाही. श्री गजानन लीलेचा पार कधीच लागायाचा नाही. अंबरींच्या चांदण्यांचा कधी हिशोब लागतो का? मी अज्ञान पामर असून मला तिळभरही बुद्धी नाही. मग ह्या लीलासागराचे वर्णन मी मूर्ख कसे करणार? त्याने जे जे वदविले ते ते मी कथित केले. लेखणीने अक्षर लिहिले खरे पण ते तिचे सामर्थ्य नाही. ती लेखणी जो हाती धरतो तोच ही सारी अक्षरे काढतो. लेखणी हे केवळ निमित्त! तसंच इथं झालंय. मी लेखणीचे काम केले. लिहिते लिहविते श्रीगजानन महाराज आहेत. त्यांच्या कृपेनेच मी हे लिहिले. यात माझा मोठेपणा काहीच नाही.

 इति स्वस्ति श्री दासगणूविरचित “गजानन विजय ग्रंथाचा विसावा अध्याय सुफळ  संपूर्ण!”  आता हा  कळसाप्रत आला व पुढील अध्याय कळसाध्याय होय. हे गजानन  महाराजांचं चरित्र लेखन जो वाचेल व चिंतन मनन करेल तो निश्चितच ह्या संसाराच्या कठीण भावसागरातून पार जाईल.

- अनुवादक: श्री वामन रुपरावजी वानरे.

मो.09826685695