श्री शंकर प्रसन्न
संतकवि श्रीदासगणू विरचित
श्रीसंत गजानन महाराज
यांचे
श्रीगुरूपाठाचे अभंग
१.
|| गण गण गणांत बोते ||
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ॥
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ।
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् ।। १ ।।
लक्ष्मीकांतं कमल नयनं योगिभिर्ध्यान गम्यं ।
वंदे विष्णु भवभयहरं सर्व लोकेकनाथम् ॥ २ ॥
दयाघना श्री स्वामीसमर्था गजानना गुरुवरा ।
कृपाकटाक्षे त्रिताप वारुन रक्षण शिशुचें करा ॥धृ।।
अज्ञानाची रात्र भयंकर चहूंकडे पसरली ।
विषयवासना सटवी टिटवी टी टी करु लागली ।।१ ।।
दिवाभीत हा मत्सर पिंगळा अहंकार साजिरा ।
मनवृक्षावर बसुन अशुभसा काढु लागला स्वरा ॥ २ ॥
नानाविध संकटें चांदण्या चमकाया लागल्या ।
त्यायोगानें सत्पथ वाटा लोपुनी गेल्या भल्या ॥३।।
अरुणोदय तो तुझ्या कृपेचा होऊं दे लवकर ।
चित्त प्राचिला उदय पावुं दे बोधाचा भास्कर ॥४।।
दशेंद्रिये हीं दहा दिशा त्या उजळतील त्यामुळें ।
सत्पथ वाटा दिसूं लागुनी हितानहित तें कळें ।।५ ।।
तुझ्या कृपेचा अगाध महिमा ज्ञाते जन सांगती ।
म्हणुन तुला मी दीनदयाळा येतो काकूळती ।।६ ।।
अंताचा ना मुळीच बघवे वरदकर धरि शिरीं ।
पापताप हें दुखयातना दासगणूच्या हरी: ।।७ ।।“काकडा”
सद्गुरुराया गजानना तंव काकडा करितों ॥ आतां ॥
उद्धारास्तव बहू आदरानें चरणद्वया धरितों ॥ धृ ॥
अज्ञानाची निशा मावळो कृपाकटाक्षांनी ।
आशा सटवी टी टी करुनी नाचविते अवनी ॥१॥
त्या सटवीला आहे आसरा मायामोहाचा ।
त्याचा टिकाव कधीं न लागे तुज पुढती साचा ॥२॥
षड्रिपु बेटे खट्याळ मोठे करिती निर्माण ।
भ्रमभोंवरा जो त्यामध्यें देतो आम्हांस टाकुन ॥३॥
त्या भोंवऱ्याला तरुन जाया पाय तुझे नौका ।
त्या नावेमध्यें भक्त बैसती तयास टाकुं नका ॥४॥
दासगणूची हीच विनंती तुज वारंवार ।
सुखें करावें भक्ता आपुल्या लोटुं नका दूर ॥५॥॥ आरती श्री गजाननाची ॥
जय जय सत्चित्स्वरूपा स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवर जडमुढ ताराया ।
।। जय देव ।।धृ।।
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापून उरलें जे या जगताशी ।
तें तूं तत्त्व खरोखर निःसंशय अससी ।
लीलामात्रें धरिलें मानवदेहासी ।। जय देव ।।१।।
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा । करूनी 'गणि गण गणांत बोते' या भजना । धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना । जिकडें पहावे तिकडे तूं दिससी नयना ।। जय देव ।।२।।
लीला अनंत केल्या बंकट सदनास ।
पेटविलें त्या अग्नीवांचूनी चिलमेस ।
क्षणांत आणिलें जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।। जय देव ।।३।।
॥ श्लोक ॥
(वृत्त-उपेंद्रवजा)
विदर्भ देर्शी शिवग्राम मोठें । विराजती सद्गुरुनाथ जेथें ॥
कृपासुधा शांत करी जिवाला । नमूं हृदीं नित्य गजाननाला ॥ १ ॥
मला असें छत्र तुझ्या कृपेचे । जगीं न कोणीहि असें जिवाचें ॥
पदीं तुझ्या आश्रय दे नताला। नमूं दयासिंधु गजाननाला ॥ २ ॥
सहा रिपू हे मज त्रास देती । गती न होई परमार्थ पंथीं ॥
सहाय्य दे दीन अजाण बाला । नमूं गुणाधीश गजाननाला ॥ ३ ॥
भवीं बुडालों दिन व्यर्थ गेले । बघून ऐसें मन दग्ध झालें ॥
करास देई शरणागताला । नमूं जगबंधू गजाननाला ॥ ४ ॥
गजानना मंगलधाम देवा । मदंतरी ज्ञानप्रदीप लावा ॥
कृतार्थ मूढास करा दयाळा । नमूं जगत्स्वामी गजाननाला ॥ ५ ॥
अघास गंगा, विधु ताप नाशी । दरिद्रता कल्पतरुहि ध्वंसी ॥
त्रयीं हि त्वदर्शनी ने लयाला । तुला तुळा केवि गजाननाला ॥ ६ ॥
तुलाच गाती श्रुती साम गानें । सहाही शास्त्रे, अठरा पुराणें ॥
त्रिमुर्ती येई जन तारण्याला । नमो महासाधु गजाननाला ॥ ७ ॥
मनांत नांदो तव ज्ञानमुर्ती । भजावया दे जन चित्ती स्फुर्ति ॥
पदाब्जि दे ठाव मला कृपाळा । नमुं जगदंद्य गजाननाला ॥ ८ ॥
यापुढे भाग पहिला यातील श्लोकप्रदक्षिणा, क्षमापण हे येथे म्हणण्यात यावे.|| श्रीशंकर ।।
संतकवि श्रीदासगणू विरचित
“श्री गुरुपाठाचे अभंग”
संतचुडामणी स्वामी गजानन । तयाचे महिमान ऐका आतां ।।
योगयोगेश्वर हाचि एक जाणा । शेगांवींचा राणा गजानन ॥
तयाचिया पायीं ठेवा आतां शिर । तरी व्हाल पार भवाब्धीच्या !।
गणूदास म्हणे आली ही पर्वणी । घ्यावी ती साधुनी प्रयत्नानें ।।१।।
कोण हा कोठिचा कांहींच कळेना । ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे ।।
साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती । आलीसे प्रचीती बहुतांना ।।
जानराव देशमुख झालासे आजारी । मृत्युशय्यैवरी पडला होता ।।
समर्थांचे तीर्थ तयासी पाजतां । दूर झाली व्यथा गणू म्हणे ॥२॥
बंकटलालाचे तें झाले असें घर । प्रती पंढरपूर स्वामीमुळे ।।
लांबलांबुनिया दर्शनास येती । लोक ते पावती समाधान ।।
भक्त भास्कराच्या -साठीं तें जीवन । केलें हो निर्माण खाचाडांत ।।
गणूदास म्हणे एका प्रदोषकाळीं । दिसले चंद्रमौळी एक्या भक्ता ॥३॥
कावळे हाकिले पंक्तीच्यामधूनी । अकोलींच्या बनी समर्थाने ।
अजूनीपर्यंत चाललें तें व्रत । पहा अकोलींत जाऊनियां ॥
पितांबरा हस्तें आणविला पाला । वठलेल्या वृक्षाला कोंडोलींत ॥
गणू म्हणे शेगांवी विस्तवावांचून । दाविली पेटवून चिलीम ती ॥४॥
मुकिंदा भक्ताचे कान्होले ते दोन । केले कीं सेवन आवडीनें ॥
मोहळाच्या माशा डसतां अपार । राहिला तो स्थिर योगिराणा ॥
कुंभक करुनी काटे मधमाशांचे । टाकिले अंगाचे बाहेर की ।
गणूदास म्हणे योग ज्यासी आला । अजिंक्य तो झाला जगामध्यें ॥५॥
गीताशास्त्रामाजीं ब्रह्माचें लक्षण । सांगी नारायण अर्जुनातें ॥
जळेना तुटेना जे कां कशानेंही । तेंच तत्व पाही ब्रह्म असे ॥
याचें प्रत्यंतर गोसाव्या दाविलें । मळ्यामाजीं भले कृष्णाजीच्या ॥
गणूदास म्हणे ऐसा अधिकारी । एक या भूवरी गजानन ॥६॥
बाळापुरी होता एक रामदासी । नाम होते ज्यासी बाळकृष्ण ॥
माघ वद्य नवमी पर्वणी ती थोर । अवघे बाळापूर आनंदले ।।
त्याच दिनी स्वामी गेले बाळापुरा । बाळकृष्णा घरा आवर्जून ॥
गणूदास म्हणे द्वारामाजीं ठेले । कौतुक दाविले अभिनव ॥७॥
जटेचे ते केस रुळती पाठीवरी । कुबडी तीही करी चंदनाची ।।
ऊर्ध्व तो त्रिपुंड्र भालासी लाविला । कंठी शुध्द माळा तुळशीची ।।
रामनामाची ती केलीसे गर्जना । वस्त्र अंगी जाणा हुरमुजीचें ॥
गणूदास म्हणे स्वामी रामदास । हाच असे खास पूर्वीचा कीं ॥८॥
बायजाबाई नामे माळ्याची कन्यका । एक होती देखा मुंडगांवांत ॥
आजन्म राहिली बायजा ब्रह्मचारी । जेवी पंढरपुरी जनाबाई॥
राजाराम कवराचा फोड बरा केला । देऊन अंगायला समर्थानीं ॥
गणूदास म्हणे बापुन्याकारण । करविले दर्शन विठ्ठलाचे ॥९॥
वासुदेवानंद योगयोगेश्वर । जयाचा अधिकार फार मोठा ॥
तेही आले स्वामी शेगांवीं भेटाया । कांही ती कराया ब्रह्मचर्चा ||
एक तो श्रीविष्णु एक विश्वेश्वर । दोघात अंतर मुळी नाही ।।
रक्तपिती व्याधी गंगाभारतीची । निवटिली साची गणूं म्हणे ॥१०॥
खंडू पाटलाचे भाऊ अनावर । होते वतनदार शेगांवींचे ।।
आपुल्या शक्तीचा अभिमान त्यां झाला । तोच निवटिला समर्थांनीं ।।
ऊंसाची ती मोळी हातानें पिळून । दिधला काढून रस प्याया ॥
गणूदास म्हणे अशक्य तें कांहीं । उरलेंच नाहीं समर्थाला ॥११॥
सोमवती पर्व माघमासीं आलें । लोक ते चालले दर्शनाला ॥
नर्मदेच्या कांठी बैसला धूर्जटी । द्याया भक्ता भेटी ओंकारी तो ॥
ओंकारेश्वर हे क्षेत्र पुरातन । पातकाचें दहन जेथे होई ।।
गणूदास म्हणे येथेची दीधला । शंकराचार्याला संन्यास तो ॥१२॥
येथे पुण्यश्लोक मांधाता भूपति । लोक अजुनि गाती कीर्ती ज्याची ॥
पूर्वपुण्य ज्याचें सबळ साचार । तोच येई नर क्षेत्रासी या
नर्मदेचें स्नान ओंकारदर्शन । घेत तया पुण्य बहुत लाभे ॥
गणूं म्हणे ऐशी माय ती नर्मदा । नुपेंक्षी हो कदा भक्तालागीं ॥१३॥
गजानन आले ऐशा त्या क्षेत्रासी । हर्ष नर्मदेसी बहुत झाला ॥
पाप्यांची पातकें क्षेत्रें घालवीती । तींच पावन होती साधुस्पर्शे ॥
नाव फुटल्याचें करुनी आमीष । नर्मदा सेवेस प्रकटली ।।
गणूदासम्हणे लावुनिया हात । पैल तटाप्रत नेली नौका ||१४||
धार कल्याणींचा साधु रंगनाथ । आला शेगांवांत भेटावया ॥
उभयतांमाजीं ब्रह्मचर्चा झाली । ती ज्यांनी ऐकिली तेचि धन्य ॥
साधूच्या मुखींचे शब्द हे अमृत । पडतां श्रवणांत तरुन जाय ।।
गणूदास म्हणे साधूची महती । देवही वानिती स्वर्गामध्ये ॥१५॥
साधूचा वशीला जयासी लागला । तोच सरता केला पांडुरंगे ॥
संत हे हरीच्या गळ्याचे ताईत । संत हे साक्षात कल्पतरु ॥
संत हेचि जाणा मोक्षाचे वाटाडे । तेवि ज्ञानगाडे प्रत्यक्षची ॥
गणूदास म्हणे आतां बोलू किती । रुक्मिणीचा पती नमी त्यासी ॥१६॥
अर्जुनाचें घोडे धूतसे भगवान । करी बाळंतपण चोख्याघरीं ॥
दामाजीपंताची रशीद बेदरी । झालासे हरी पोहोचवीता ।।
नाथाचे सदनीं पाणी तें वाहिले । शेत रक्षियलें सावत्याचें ॥
गणूदास म्हणे ऐसा संतप्रेमा । आहे पुरुषोत्तमा पहा तुम्ही ॥१७॥
आळंदी, पैठण, देहू, अष्टी, तेर । तैसां तो साचार सज्जनगड ।।
अरण, मंगळवेढें संतांची ही गांवें । तैसैचि लेखावें शेगांवला ||
कोणत्याही अंशें फरक नाहीं यांत । शेगांव साक्षात संतभूमी ।।
प्रभातीं या गांवा भावें आठवितां । गणूं म्हणे चिंता होते दूर ॥१८॥
नरजन्माचे या सार्थक करा रे । अहोरात्र ध्यारे पांडुरंगा ॥
गजाननापायीं द्दढ श्रध्दा ठेवा । द्वेष तो नसावा कोणाचाही ॥
प्रत्येक गाहाणे सांगा संतापाशीं । होईल तो त्यासी निवटिता ॥
गणूदास हेंची सांगे वारंवार । जोडा आतां कर गजानना ॥१९॥
गुरुराया आमुची उपेक्षा न करी । तुझ्या बळावरी आमुच्या उड्या ।।
त्रिविध तापाचें निर्मूलन करा । आरोग्य शरीरा देऊनिया ।।
हात पसरण्याचा प्रसंग ना आणी । कोणापुढे जनीं गजानना ।।
गणूदास म्हणे आनंदीत वृत्ती । ठेवावी गुरुमूर्ति सर्वकाळ ॥२०॥
वारी शेगांवाची करी जो कां भक्त । तयासी अनंत सांभाळील ॥
गजाननापायीं शुद्ध ज्याची निष्ठा । तयालागी कष्टा दे ना हरी ॥
गजानन कीर्तिचे करी जो कां गान । तया नारायण दूर नाहीं॥
अनुभव याचा घ्या रे तुम्ही सारे । विनवी अत्यादरें दासगणूं ॥२१॥